वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
भारताने जगातली पहिली डीएनए लस विकसित केली आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ही लस देण्यात येऊ शकते. आरएनए लस अंतिम टप्प्यात आहे. भारताचे शास्त्रज्ञ नेझल लस अर्थात नाकाद्वारे लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. औषधनिर्मिती क्षेत्रातील या सर्व कामगिरीची माहिती देत जगातील औषध उत्पादकांना भारतात येण्याचे आमंत्रण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युएनजीए’च्या सभेमध्ये दिले. तसेच भारतीयांची प्रगती होते, तेव्हा जगाच्या विकासाला हातभार लागतो असे स्पष्ट करत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व अधोरेखित केले. याचदरम्यान दहशतवादाच्या मुद्दय़ावर त्यांनी पाकिस्तानला फटकारले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित केले. आमसभेमध्ये मोदींसमवेत एनएसए अजित डोभाल, विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला. दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून उपयोग करणाऱयांनी याचा फटका तुम्हालाही बसू शकतो हे लक्षात घ्यावे, असे सांगत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.
अफगाण-पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या फटकार
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादाची बीजे रोवण्यासाठी होऊ नये यासाठी ‘युएनजीए’ने पुढाकार घ्यायला हवा असे स्पष्ट करत तेथील संवेदनशील परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेऊ नये, याकडे लक्ष द्यावे लागेल, असेही मोदी म्हणाले. तसेच अफगाणिस्तानमधील परिस्थिती, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विश्वासार्हतेवर तसेच परिणामकारकतेवर भाष्य केले. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडून काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतील संबोधनात केला होता. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
भारताचा ‘लस’महिमा अधोरेखित
भारताने जगातील पहिली डीएनए लस विकसित केली आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ही लस देण्यात येऊ शकते. आरएनए लस अंतिम टप्प्यात आहे. भारताचे शास्त्रज्ञ नेझल लस अर्थात नाकाद्वारे लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारताने घेतलेली झेप आणि इतर देशांना लसी निर्यात करण्यासाठी भारताने चालवलेले प्रयत्न यांचीही माहिती पंतप्रधानांनी आमसभेत दिली.
लोकशाहीवरही भाष्य
भारताने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे. आमची विविधता सक्षम लोकशाहीचे प्रतीक आहे. असंख्य भाषा, विविध संस्कृती आणि जात-पंथाचे लोक एकत्रित नांदणारा भारत हा देश व्हायबंट लोकशाहीचे द्योतक असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. तसेच भारताचा पंतप्रधान या नात्याने संयुक्त राष्ट्र परिषदेला चौथ्यांदा संबोधित करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी अभिमानही व्यक्त केला.