वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानात शांतता प्रक्रियेचा रोडमॅप निश्चित करण्याप्रकरणी 5 अन्य देशांसोबत आता भारताचीही भूमिका असणार आहे. 6 महिन्यांपर्यंत चाललेल्या बॅकडोअर डिप्लोमसीनंतर अफगाणिस्तानात शांतता प्रक्रियेच्या वाटाघाटींमध्ये रशिया, इराण, चीन आणि पाकिस्तानसह भारतही सामील होणार आहे.
अमेरिकेने चर्चेत भारताला सामील करण्याचा प्रस्ताव मांडला, तर रशियाच्या योजनेतून भारताला वगळण्यात आले हेते. अफगाणिस्तान दशकांपर्यंत गृहयुद्धाच्या आगीत होरपळला आहे. या गृहयुद्धात अमेरिका आणि रशियाही सामील होते. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैनिक माघारी परतल्यावर तेथे दहशतवादी संघटना सक्रीय होऊ शकतात अणि क्षेत्रात अस्थिरता वाढण्याची चिंता भारताला आहे. तालिबानला बळ पुरविण्यात पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. अफगाणिस्तानात तालिबानचे प्रभुत्व राहिल्यास पाकिस्तानला वरचष्मा प्राप्त होणार आहे. तसेच अफगाणिस्तानातील भारताची गुंतवणूक तसेच सामरिक रणनितीवर प्रतिकूल प्रभाव पडणार आहे.
चीनशी वाढत्या जवळीकीदरम्यान रशियाने चर्चेच्या टेबलवर चीन, अमेरिका, पाकिस्तान आणि इराणला सामील करण्याचा तर भारताला वगळण्याचा प्रस्ताव मांडला होता. पाकिस्तानला डोळय़ासमोर ठेवून असे करण्यात आले होते. अफगाणिस्तानशी संबंधित चर्चेत भारत नसावा अशी आग्रही मागणी पाकिस्तानची आहे.
पण भारताने स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी अफगाणिस्तानातील सर्व महत्त्वाचे घटक आणि अन्य देशांशी चर्चा केली आहे. भारताच्या हितसंबंधांची सुरक्षा आवश्यक आहे. पुढील काही महिने या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत असे एका अधिकाऱयाने म्हटले आहे. या टीममध्ये सहभागी होत भारत दहशतवाद, हिंसाचार, महिला अधिकार आणि लोकशाहीवादी मूल्यांशी संबंधित स्वतःच्या अटी ठेवण्याच्या स्थितीत येणार आहे. भारत तालिबानला विरोध करत राहिला आहे. अफगाणिस्तानात अफगाणींचे नेतृत्व, अफगाण नियंत्रित प्रक्रियेचे भारताने समर्थन केले आहे. पण स्थिती बदलल्याने अफगाणिस्तानात दुसरी बाजू वरचढ ठरू लागली आहे.
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी मागील आठवडय़ात अफगाण अध्यक्ष अशरफ गनी आणि हाय कौन्सिल फॉर नॅशनल रिकग्निशनचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला यांना पत्र पाठविले होते. यात अफगाणिस्तानसंबंधी अमेरिका, भारत, रशिया, चीन, पाकिस्तान आणि इराण यांनी एकमताने निर्णय घ्यावा असे नमूद होते.
सूत्रांनुसार संबंधित परिषदेत भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर सामील होऊ शकतात. अफगाणिस्तानात अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी जाल्मे खालिजाद आणि जयशंकर यांच्यात फोनवरून यासंबंधी चर्चा झाली आहे. जानेवारी महिन्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अफगाणिस्तानच्या दौऱयावर गेले होते. अफगाणिस्तानात भारताची सक्रीय भूमिका अमेरिका इच्छित आहे.