पुढच्या मंगळवारी अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप तर डेमॉक्रेटिक पक्षाकडून ज्यो बायडन उमेदवार आहेत. या निवडणुकीकडे भारतासह जगातील प्रत्येक देशाचे व त्या देशाच्या सरकारचे लक्ष लागून राहिले आहे. कारण अमेरिका प्रथम क्रमांकाची जागतिक महासत्ता आहे आणि तिच्या धोरणांवर जगाची आर्थिक, राजकीय आणि सामरिक समीकरणे ठरत असतात. भारतासाठीही ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. याचे कारण असे की 1990 मध्ये अमेरिका व रशिया यांच्यातील उघड शीतयुद्ध संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भारत व अमेरिका यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा जास्त जवळचे झाले. गेल्या तीन दशकांमध्ये ते उत्तरोत्तर अधिक घनिष्ट होत गेले. गेल्या पाच सहा वर्षांमध्ये संरक्षण आणि सामरिक क्ष्sात्रांमध्येही दोन्ही देश एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल करत असल्याचे दिसते. दोन्ही देशांसमोर चीन हे महत्त्वाचे आव्हान उभे असल्याने असे सहकार्य नैसर्गिकच आहे. परिणामी अमेरिकेत कोण अध्यक्ष होणार आणि कोण अध्यक्ष झाल्यास भारतासाठी अनुकूल ठरेल हा भारतात चर्चिला जाणारा विषय आहे. म्हणून या निवडणुकीची दखल घेणे विशेषत्वाने क्रमप्राप्त ठरते. ट्रंप आणि बायडन यांच्यात ट्रंप हे भारतासाठी जास्त अनुकूल आहेत, असा सर्वसाधारण सूर वृत्तपत्रीय किंवा प्रसारमाध्यमांच्या विश्लेषणांमधून दिसून येतो. बायडन अध्यक्ष झाल्यास पाकिस्तानसंबंधीची अमेरिकेची नीती आतापेक्षा मवाळ होईल आणि त्याचा भारताला फटका बसेल असेही भाकित केले जाते. हे भाकित करणाऱयांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विरोधकांचा भरणा जास्त असल्याचेही दिसून येते. (जणू काही असेच व्हावे, याची ते वाट पहात आहेत). पण वस्तुस्थिती तशी आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ट्रंप यांच्या काळात त्यांनी भारताला पाकिस्तानपेक्षा जास्त महत्त्व दिले. भारताला अत्याधुनिक शस्त्रे विकण्यास त्यांनी आडकाठी केली नाही. इराण आणि रशिया यांच्याशी अमेरिकेचे संबंध चांगले नसतानाही भारत रशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा करार करू शकला आणि अमेरिकेने रशियाकडून अशी शस्त्र खरेदी करण्यास विरोध करणारा कायदा केला असूनही भारताला ही मुभा देण्यात आली. भारताशी मर्यादित स्वरूपाचा संरक्षण करार अमेरिकेने केला. तथापि, भारतीयांच्या अमेरिकेत काम करण्यासाठी दिल्या जाणाऱया व्हिसासंबंधात त्यांचे धोरण कठोर होते. तसेच काहीवेळा त्यांनी भारताच्या विरोधात काही विधाने करून खळबळ उडवून दिली होती. एकंदर ट्रंप यांची ही चार वर्षे भारतासाठी सकारात्मक पण संमिश्र परिणामांची ठरली असे म्हणता येते. बायडन यांच्या संदर्भात सांगायचे, तर त्यांनी पूर्वी भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केले आहे. तसेच बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना बायडन उपाध्यक्ष होते. ओबामा यांच्या काळात त्यांचे आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांचे सख्य होते. ओबामा यांच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यात सामरिक सहकार्याची महत्त्वाची पावले उचलण्यात आली होती. ओबामा यांनीही पाकिस्तानपेक्षा भारताला जास्त महत्त्व दिले होते, पण ट्रंप यांच्यापेक्षा त्यांचे पाक धोरण सौम्य होते. कारण त्यांनी पाकिस्तान दहशवादाविरोधात प्रामाणिकपणे कठोर कारवाई करत नसूनसुद्धा त्या देशाचे आर्थिक सहाय्य बंद केले नव्हते. भारताचे राजदूत म्हणून आणि ओबामा यांच्या काळात उपाध्यक्ष म्हणून काम करताना बायडन हे भारताच्या धोरणांशी, भारताच्या काश्मीर नीतीशीही परिचित झाले आहेत. त्यामुळे ते भारताला नवे आहेत असे मानण्याचे कारण नाही. परिणामी, ट्रंप किंवा बायडन यांच्यापैकी कोणाचाही या निवडणुकीत विजय झाला, तरी एकंदर परिस्थिती पाहता अमेरिका भारत किंवा चीन तसेच पाकिस्तान यांच्या विषयीच्या धोरणात आमूलाग्र परिवर्तन करेल हे संभवत नाही. भारतात ज्याप्रमाणे प्रत्येक पक्षाची स्वतःची स्वतंत्र विचारसरणी असते, तशी अमेरिकेतील राजकीय पक्षांचीही आहे. त्यानुसार कोणत्याही पक्षाचा नेता सत्तेवर आल्यानंतर परराष्ट्र आणि सामरिक धोरणांमध्ये काही फेरफार होतात. पण एखाद्या देशाचे धोरण हे त्या देशाच्या नेत्याची व्यक्तिगत मते किंवा पूर्वग्रह तसेच त्याच्या पक्षाच्या विचारसरणीनुसारच ठरते असे नाही. तर ते परिस्थितीसापेक्ष असते. म्हणजेच जागतिक परिस्थिती आणि त्या त्या काळातील आव्हाने यानुसार ते ठरवावे लागते. पुन्हा या संदर्भात ओबामा यांचे उदाहरण देता येईल. ते 2008 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या पहिल्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेत जाण्यास बंदी होती. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तथापि, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेने ओबामांच्याच दुसऱया काळात मोदींविषयक धोरणांमध्ये मोठे परिवर्तन केले आणि दोन्ही नेत्यांमध्ये 2014 ते 2016 या दोन वर्षांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच याच काळात अमेरिका आणि भारत हे दोन देशही एकमेकांच्या आणखी जवळ आल्याचे दिसले होते. याचाच अर्थ असा की कोणत्याही देशाची महत्त्वाची धोरणे परिस्थितीनुसार आणि व्यवहारी गणितावर ठरत असतात. सध्याची परिस्थिती अशी आहे की अमेरिकेच्या दक्षिण आशिया आणि प्रशांत महासागरीय हितसंबंधांना चीनच्या आक्रमक विस्तारवादाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे आणि चीनसमोर उभे राहण्याची क्षमता असणारा भारत हा एकमेव देश आशियात आहे, म्हणून अमेरिकेलाही भारताचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानच्या संदर्भात सांगायचे तर त्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवाद पोसून जगाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रंप किंवा बायडन यांच्यापैकी कोणीही विराजमान झाले तरी भारत, चीन आणि पकिस्तान यांच्याविषयीची अमेरिकेची धोरणे भारताला चिंता वाटावी अशा प्रकारे बदलण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे बायडन निवडून आले तर पंतप्रधान मोदींची कोंडी होईल अशा मनोराज्यांमध्ये जर कोणी दंग असेल तर तसे होईलच अशी शाश्वती देता येत नाही. ट्रंप निवडून आल्यास आताचेच धोरण राहील.
Previous ArticleउदयोSस्तु अंबे !
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.