पाकिस्तानला शहाणपणा सूचला : राष्ट्रीय सुरक्षा धोरणात भारतासोबत शांततापूर्ण संबंधांवर भर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानने स्वतःचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण तयार केले आहे. हे पूर्ण धोरण उघड करण्यात येणार नसले तरीही याचा काही हिस्सा पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी जारी करणार आहेत. भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल. याचबरोबर काश्मीर मुद्दा दोन्ही देशांमधील व्यापाराच्या मार्गात अडथळा ठरू देणार नसल्याचे या धोरणात म्हटले गेले आहे. परंतु भारतात मोदी सरकार असेपर्यंत शांतता प्रस्थापित होण्याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.
धोरणात पाकिस्तान स्वतःच्या लगतच्या शेजाऱयांसोबतचे संबंध सुधारल्याशिवाय विकास करू शकत नसल्याचे नमूद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सर्वात मोठा वाद काश्मीरवरून असला तरीही यावर तोडगा निघाला नसला तरीही पाकिस्तान आता भारतासोबत व्यापार सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे धोरणाद्वारे सांगण्यात आले आहे.
जनतेला उपलब्ध नसेल अहवाल
राष्ट्रीय सुरक्षा धोरण पूर्णपणे जनतेसमोर मांडले जाणार नाही. याचा अत्यंत छोटा हिस्साच सार्वजनिक केला जाणार असल्याचे पाकिस्तान सरकारने पूर्वीच स्पष्ट केले आहे. धोरणात तिन्ही संरक्षण दले आणि अण्वस्त्रांचाही उल्लेख असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. धोरणात मुख्य भर व्यापार आणि वाणिज्यिक संबंध तसेच विकासावर आहे. आण्विकशक्ती असलेल्या भारताचा यात विशेष स्वरुपात उल्लेख आहे.
भारताविषयी आणखीन काय?
भारतासोबत पुढील 100 वर्षांपर्यंत आम्ही तणावपूर्ण संबंध ठेवू शकत नाही. याचमुळे शांतता प्रस्थापित करणे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. आर्थिक सुरक्षेशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे आणि याचमुळे सर्वप्रथम शेजाऱयांशी संबंध सुधारणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळण्यासाठी पाकिस्तान स्वतःची सुरक्षा आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. काश्मीर आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा होता आणि राहणार आहे. परंतु या कारणामुळे दोन्ही देशांमधील व्यापार बंद होऊ नये. परंतु भारतात मोदी सरकार असेपर्यंत हे कठिण असल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
आर्थिक संकट
पाकिस्तानवर नेहमीच अमेरिकेचा प्रभाव राहिला आहे. आमची अर्थव्यवस्था सुधारत नाही तोवर आम्ही एक देश म्हणून समस्येतच राहू. भारतासोबत चर्चा सध्या शक्य वाटत नाही. बिकट अर्थव्यवस्थेमुळे आमची सुरक्षा देखील धोक्यात आल्याचे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉक्टर मोईद युसूफ यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.