जगात आज भारत देश हा सगळय़ात मोठय़ा विकसनशील देशांमधला एक म्हणून गणला जातो. पण, भारताकडे संपत्ती, नैसर्गिक संसाधने, प्रतिभा आणि संस्कृतीचा साठा असूनही या देशावर वर्षानुवर्षे अन्याय होत आला आहे. ब्रिटिशांनी भारतावर ताबा मिळवण्यापूर्वी हा देश सुसंधीचा साठा होता. अपरंपार संसाधनाने आणि इतिहासाने भरलेला हा देश प्रगतीकडे झपाटय़ाने पावले टाकत होता. प्रत्येक धर्माचे या देशात एक वेगळे स्थान होते आणि ‘विविधतेमध्ये एकता’ हा मंत्र मनात ठेवून लोक समाजामध्ये वावरायचे. ब्रिटिशांनी जेव्हा भारतात प्रवेश केला, तेव्हा त्यांना आपण आदराने समाविष्ट केले कारण पाहुण्यांचा आदर करणे, त्यांचा पाहुणचार करणे ही आपली संस्कृती आहे. ह्याच चांगुलपणाचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी तब्बल 150 वर्षे भारतावर राज्य केले.
जरी आपल्या देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्यापूर्वीच्या दुर्दैवी अत्याचाराचे परिणाम आपण आजदेखील भोगतो आहोत. ब्रिटिशांनी 1947 मध्ये आपला देश सोडला, पण जाताना त्यांनी भारतातील माणसांची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक हानी केली. भारताच्या समावेशक संस्कृतीला मोडून समाजामध्ये भेदभाव पसरवला. पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीला चुकीचे ठरवून पाश्चात्य पद्धती आपल्यावर लादल्या गेल्या. यामुळे अजूनही बरेचदा आपल्याला आपल्याच संस्कृतीची लाज वाटते कारण पाश्चात्य संस्कृतीत ते बसत नाही. केवळ संस्कृतीतच नाही तर आपल्या राहणीमानात, खाण्या-पिण्याच्या पद्धतींमध्ये, सणांमध्ये आणि पोषाखामध्येदेखील पाश्चात्य प्रभाव वाढत गेला.
देशाबाहेरील कारखाने व व्यवसाय जेव्हा त्यांची दुकाने भारताच्या भूमित उघडायला लागले, तेव्हा बऱयाच प्रमाणात भारत जागतिकीकरणाचा भाग झाला, पण त्याबरोबर देशाची अर्थव्यवस्थादेखील कोसळू लागली. कारखान्यात यंत्र आल्याने मोठय़ा प्रमाणात होणाऱया उत्पादनाची मागणी वाढू लागली आणि स्थानिक कारागिरांच्या वस्तूंचे खप कमी झाले. एवढे होऊनसुद्धा भारतीय जनतेच्या मनामध्ये हेच बिंबवले गेले की देशात प्रतिभेची आणि बुद्धीची वानवा असल्यामुळे हा देश इतर देशांपेक्षा मागासलेला आहे.
पण भारताचे कौशल्य आजही तितकेच तेजस्वी आहे जितके इतिहासात आपण वाचत आलो आहोत. बऱयाचदा लोकांना हे लक्षात येत नाही पण भारतीयांनी जगाला खूप काही दिले आहे. कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास केला तरी त्यात भारताकडून मिळालेली अर्थपूर्ण देणगी तुम्हाला नक्की सापडेल. योग साधना, ज्याला आज योगा म्हणून ओळखले जाते, त्याचा जन्म भारतातच झाला आहे. योग ही एक अशी साधना आहे जी शरीर निरोगी ठेवण्याबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी तेवढीच अनुकूल आहे. या देशात तब्बल 22 भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेची एक स्वतंत्र ओळख आहे. त्यातील तामिळ आणि संस्कृत या जगातील सगळय़ात जुन्या भाषांमधील एक मानल्या जातात आणि त्यांचा उगम हा साधारण 5,000 वर्षांपूर्वीचा आहे.
या व्यतिरिक्त, सुश्रुत संहितेनुसार सुश्रुतला ‘शस्त्रक्रियेचा सूत्रधार’ मानले गेले आहे. सुश्रुत संहितेनुसार 5,000 वर्षांपूर्वी, सुश्रुत वैद्यांनी पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरी जनतेसमोर प्रस्तुत केली होती. या ग्रंथामध्ये 1,120 आजार, 700 औषधी वनस्पती आणि विविध शस्त्रक्रियांची तपशीलवार माहिती लिहिली आहे. हा सर्व शोध तंत्रज्ञानक्रांतीच्या कित्येक शतकांपूर्वी झाला आहे.
कला, संस्कृती आणि संगीत यासाठी भारत देश विशेष प्रसिद्ध आहेच. प्रत्येक राज्याशी किमान एक तरी नृत्य, वाद्य, भाषा आणि कला जोडली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये लावणी, तामिळनाडूमध्ये भरतनाटय़म, आसाममध्ये सत्तरीया तर आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी अशा अद्वितीय नृत्यांचा आस्वाद आज आपण जगाला देऊ शकतो. जगातील कला आणि साहित्याच्या इतिहासात भारताने नेहमीच आपले स्वतंत्र अस्तित्व सुस्थितीत ठेवले आहे. जर कलेबद्दल बोलायचे झाले तर भारतीय सिनेसृष्टी आज जगप्रसिद्ध आहे. अमिताभ बच्चन, शाहरुखखान, रेखा, मुमताज अशा कित्येक कलाकारांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लाखो-करोडोंची मने जिंकली आहेत. मकबूल फिदा अर्थात एम. एफ. हुसेन ह्यांना ‘भारताचा पिकासो’ म्हटले जाते. त्यांनी 6 लाखापेक्षा जास्त चित्रकला केल्या आहेत ज्या आज जगप्रसिद्ध आहेत. भारताच्या पहिल्या वर्तमानकालीन कलाकार अर्पिता सिंग ह्यांच्या चित्रांमुळे बंगाली लोककलेचा प्रसार जगभर झाला आहे. विज्ञानात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सी. वी. रामन, वेंकटरमण राधाकृष्णन, सत्येंद्रनाथ बोस अशा दिग्गज शास्त्रज्ञांची नावे आजही घेतली जातात. इतक्मया कमी शब्दांमध्ये भारताचे कौशल्य मांडणे शक्मय नाही. या बहुमोल संस्कृतीला जोपासण्याची आवश्यकता आहे. आधुनिकीकरणामुळे आपल्या संस्कृतीमध्ये पाश्चात्य संस्कारांची होणारी भेसळ या सगळय़ा प्रतिभेला झाकून टाकत आहे. भारतामध्ये पुन्हा एकदा ‘विविधतेमध्ये एकता’ ही भावना निर्माण होणे गरजेचे आहे. येत्या पिढीला क्रांतीचा सूत्रधार होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पुन्हा एकदा या देशातील माणसांसमोर त्यांचा श्रीमंत आणि भव्य इतिहास प्रस्तुत केला पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून रोजच्या आयुष्यात व्यक्तिगत पातळीवर थोडे बदल केले तरी त्याचा प्रभाव हा देशाच्या प्रगतीला उपयोगी पडू शकतो. आंतरराष्ट्रीय व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा त्यातील काही रक्कम जर आपण स्थानिक व्यवसायांवर खर्च केली तर हळूहळू भारताची अर्थव्यवस्था नक्कीच सुधारेल. कित्येक लोक आज स्वतःचे व्यवसाय घेऊन येत आहेत ज्यात विकल्या जाणाऱया वस्तू आणि सुविधा या पूर्णपणे भारतीय आहेत. याचा फायदा देशाची आर्थिक स्थिती सुधारायला तर होतोच पण त्याचबरोबर रोजगाराचे प्रमाणदेखील वाढते. भारतीय कला जोपासणे अतिशय गरजेचे आहे कारण पुढील पिढीसाठी हा प्रतिभेचा साठा एक आदर्श बनू शकतो. माणसाची ओळख ही त्याचा वारसापासून, भाषेपासून, राहणीमानापासून आणि संस्कारांपासून घडत असते. अशावेळेला भारतीय इतिहासाला जागतिकीकरणाच्या जाळय़ात हरवण्यापासून थांबवले पाहिजे. कारण भारत देश हा जरी पाश्चात्य संस्कृतीपेक्षा भिन्न असला तरी तो अकार्यक्षम नाही. खरेतर तो पाश्चात्य संस्कृती सारखा नाही आहे, म्हणूनच भारताचा वारसा हा अद्वितीय आहे. स्थानिक व्यावसायिकांची मदत करून, आपली संस्कृती नव्याने जगासमोर मांडूया. त्याचबरोबर मातृभाषेमध्ये शिक्षण प्राप्त करण्याचे स्वातंत्र्य देऊन आपण भारताची हरवलेली संपत्ती पुन्हा मिळवू शकतो. ही संपत्ती म्हणजे फक्त पैसे आणि प्रसिद्धी नाही, तर माणसांना जोडणारी आणि घडविणारी एक सुंदर संस्कृती आहे.
-श्राव्या माधव कुलकर्णी