लंडन / वृत्तसंस्था
सातत्याने बायो-बबलमध्ये राहिल्याने आलेला मनाचा थकवा दूर करण्यासाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना 3 आठवडय़ांची सुटी जाहीर केली आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप फायनल व इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी यात 42 दिवसांचे अंतर असून यातील 3 आठवडे खेळाडूंना पूर्ण मुभा असेल. या कालावधीत खेळाडू इंग्लंडमधील आपल्या निकटवर्तियांकडे, परिचितांकडे जाऊ शकणार आहेत.
भारताची न्यूझीलंडविरुद्ध फायनल दि. 18 ते 22 जून या कालावधीत होणार आहे तर त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्ट रोजी सुरुवात होईल. या मध्यंतरात जवळपास 20 दिवसांची सुटी खेळाडूंना दिली जाणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये 42 दिवसांचे अंतर असले तरी प्रवासावरील निर्बंध, दोन्ही देशातील क्वारन्टाईनचे नियम या पार्श्वभूमीवर भारतीय संघ इंग्लंडमध्येच थांबणार आहे.