वृत्तसंस्था / केपटाऊन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे रविवारी झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला षटकांची गती राखता न आल्याने आयसीसीने दंड ठोठावला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयातील भारतीय संघाचा हा शेवटचा सामना होता. या दौऱयात भारताला कसोटी आणि वनडे मालिकाही गमवावी लागली आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना षटकांची गती राखता आली नाही. आयसीसीच्या इलाईट सामनाधिकारी पॅनलचे पायक्राफ्ट यांनी भारतीय संघातील खेळाडूंना मिळणाऱया मानधन रक्कमेतील 20 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यांना दोन षटकांसाठी अधिक कालावधी घ्यावा लागला. कर्णधार के.एल. राहुलने या गुन्हय़ाची कबुली दिली असून आपला संघ दंड देईल, असे सुनावणीवेळी सांगितले.