वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे भारताचे नेमबाज पथक यापूर्वी झाग्रेबमध्ये सराव करीत होते. आता हे पथक झाग्रेबहून ऍम्स्टरडॅममध्ये दाखल झाले आहे.
भारतीय नेमबाज पथकातील पिस्तूल नेमबाज विदेशी प्रशिक्षक स्मिरनोव्ह अद्याप झाग्रेबमध्ये आहेत. शुक्रवारी भारताचे इतर नेमबाज ऍम्स्टरडॅममध्ये दाखल झाले आहेत. तेथून हे पथक टोकियोकडे प्रयाण करेल. टोकियो ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय नेमबाज पथकासाठी झाग्रेबमध्ये सराव आणि प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती. झाग्रेबमध्ये त्यांचा तब्बल 80 दिवस मुक्काम होता. गेल्या दोन दिवसापासून भारतीय नेमबाजांची वारंवार कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ऍम्स्टरडॅममध्ये दाखल झालेल्या पथकामध्ये 13 नेमबाजांचा समावेश आहे. भारताची पिस्तूल आणि रायफल संघातील हे सदस्य आहेत. मिराज अहमद खान आणि अंगदवीर सिंग इटलीमध्ये सराव करीत आहेत. भारताचे हे दोन्ही स्किट नेमबाज ऍम्स्टरडॅममध्ये भारतीय संघात दाखल होतील. क्रोएशियन आणि झाग्रेब नेमबाज फेडरेशनतर्फे भारतीय नेमबाज पथकासाठी खास निरोप समारंभ आयोजित केला होता. या समारंभावेळी भारतीय नेमबाजांचा गौरव करून त्यांना टोकियो ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ऍम्स्टरडॅम येथून भारतीय नेमबाज पथक टोकियोला प्रयाण करणार आहे. भारताचे तीन नेमबाज प्रशिक्षक जसपाल राणा, वेदप्रकाश आणि मनोजकुमार हे दिल्लीहून टोकियोला रवाना होतील. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजांकरिता आणखी एक अतिरिक्त प्रशिक्षकाला पाठविण्यासाठी अखिल भारतीय रायफल संघटनेचे प्रयत्न चालू आहेत. भारतीय नेमबाज पथकामध्ये 8 रायफल नेमबाज, 5 पिस्तूल नेमबाज आणि 2 स्किट नेमबाजांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या पथकामध्ये प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षक वर्गाचाही समावेश आहे.