वृत्तसंस्था/ बेलग्रेड
येथे सुरू असलेल्या विश्वचषक महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल अंशू मलिकने 57 किलो वजनगटात रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत वैयक्तिक गटात पदक मिळविणारी अंशू मलिक ही भारताची एकमेव मल्ल आहे.
अंशू मलिकने यापूर्वी कनिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात प्रवेश केल्यानंतर अंशू मलिकने विश्वचषक महिलांच्या कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनगटातील वैयक्तिक विभागात पहिले रौप्यपदक मिळविले. बुधवारी रात्री येथे झालेल्या महिलांच्या 57 किलो वजनगटातील अंतिम लढतीत माल्डोव्हाच्या ऍनेस्टेसिया निचिताने मलिकचा 5-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अनशुला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
चालूवर्षीच्या प्रारंभी नवी दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत अंशूने कास्यपदक तर गेल्या जानेवारीत रोममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. आतापर्यंत तिने तीन विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके मिळविली आहेत. अंशूने बेलग्रेडमधील स्पर्धेत रशियाच्या चुमीकोव्हाचा उपांत्य सामन्यात पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
या स्पर्धेत सहभागी झालेली भारताच्या पिंकीने 55 किलो वजनगटात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. 59 किलो वजनगटात सरिता, 62 किलो वजनगटात सोनम मलिक आणि 65 किलो वजनगटात साक्षी मलिक यांना उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नाही. पुरूषांच्या ग्रीको रोमन पद्धतीमध्ये भारताचा एकमेव मल्ल अर्जुन हेलाकुरकी याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे तर भारताच्या इतर पुरूष मल्लांना पात्र फेरी पार करता आली नाही.