कडक निर्बंधांनंतर एअर इंडियाची सर्व उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत रद्द
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसात भारतातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागल्यानंतर अनेक देशांनी भारतातून येणाऱया विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे. भारतातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता ब्रिटनने भारताला लाल यादीत टाकले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर ब्रिटनने देशात काही कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार भारतातून ब्रिटनला प्रवास करणाऱया प्रवाशांवर बंदी घालण्यात आल्यामुळे एयर इंडियाने ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणे 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत. एयर इंडियाच्यावतीने यासंबंधी निवेदन जारी करत प्रवाशांनाही त्यासंबंधी माहिती कळवली आहे. आतापर्यंत बुकिंग केलेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पैसे रीफंड केले जाणार आहेत.
आतापर्यंत भारतातून ब्रिटनमध्ये गेलेल्या पर्यटक किंवा नागरिकांना तेथे 10 दिवस विलगीकरणात ठेवले जात आहे. ब्रिटनमध्ये भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले असल्याचे समजल्यानंतर अन्य देशांमधून आलेल्यांसाठी स्वतंत्र नियमावली सरकारने जारी केली आहे.