पुन्हा एकदा भारतीय सलामीवीरांवर फोकस, पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील दुसऱया फळीतील भारतीय खेळाडूंचा संघ आज (मंगळवार दि. 11) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोर मालिकाविजयाचे मुख्य लक्ष्य असणार आहे. उभय संघातील ही 3 सामन्यांची मालिका 1-1 फरकाने बरोबरीत असून त्यामुळे आजच्या लढतीला ‘व्हर्च्युअल फायनल’चे स्वरुप लाभले आहे. ही लढत दुपारी 1.30 वाजता खेळवली जाईल.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱया सामन्यात पूर्ण सर्वस्व पणाला लावत प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणले आणि मालिकेत बरोबरी साधली. मात्र, येथे तिसऱया व निर्णायक लढतीत खेळताना भारतासमोर कर्णधार शिखर धवन व युवा फलंदाज शुभमन गिल या सलामीवीरांच्या खराब फॉर्मची मुख्य चिंता असणार आहे. या दोन्ही दिग्गज फलंदाजांना सध्या सुरु असलेल्या मालिकेत बरेच झगडावे लागले आहे.
मागील दोन वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण योगदान देत आलेल्या शिखर धवनला या मालिकेत मात्र अवघ्या 17 धावा जमवता आल्या आहेत. पुढील वर्षी होणाऱया वनडे वर्ल्डकपमधील स्थान निश्चित करण्यासाठी येथे त्याला आणखी एक संधी असेल. दुसरीकडे, शुभमन गिलकडून देखील भारताला बहरात परतण्याची अपेक्षा असणार आहे. पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्यानंतर त्याने दुसऱया सामन्यात उत्तम सुरुवात केली. पण, नंतर तो याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नव्हता.
वनडे वर्ल्डकपसाठी संघव्यवस्थापन अनेक प्रयोग राबवून पाहत असताना त्या वाटचालीत श्रेयस अय्यर, इशान किशन व उपकर्णधार संजू सॅमसन मध्यफळीत दर्जेदार योगदान देत आले आहेत. गोलंदाजीच्या आघाडीवर, मोहम्मद सिराजने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले तर स्पिनर शाहबाज अहमद व रवि बिश्नोई यांनी उत्तम पदार्पण नोंदवले. दुसऱया फळीतील संघ खेळत असल्याने फारसे दडपण नसले तरी पूर्ण ताकदीच्या दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध लढणे भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे.
दक्षिण आफ्रिकन संघ सध्या 11 व्या स्थानी असून पुढील वर्षातील वनडे विश्वचषक स्पर्धेत थेट एन्ट्री न मिळण्याचा धोका त्यांच्यासमोर आहे. दुखापतीतून सावरलेल्या तेम्बा बवूमाला अद्याप सूर सापडलेला नाही, ही आफ्रिकन संघासमोरील मुख्य चिंता आहे. यापूर्वी दुसऱया वनडेत तो खेळू शकला नव्हता. आता निर्णायक तिसऱया लढतीत त्याचा संघात समावेश असेल का, हे आज स्पष्ट होईल.
हंगामी कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकल्यानंतर योग्य निर्णय घेतला नाही आणि याचा दक्षिण आफ्रिकन संघाला फटका सोसावा लागला. आज मात्र या निर्णायक लढतीत पहिल्या लढतीप्रमाणे विजय खेचून आणण्याचे त्यांचेही लक्ष्य असेल. क्विन्टॉन डी कॉक, एडन मॅरक्रम व डेव्हिड मिलर या मुख्य खेळाडूंवर देखील त्यांची बरीच भिस्त असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अवेश खान, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी.
दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), जानेमन मलान, क्विन्टॉन डी कॉक, एडन मॅरक्रम, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पर्नेल, केशव महाराज, कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शमसी, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को जान्सन, ऍनरिच नोर्त्झे, अँदिले फेहलुकवायो.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 वा.
वरुणराजाची मेहेरनजर लाभणार का?
आजच्या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता असून मागील तीन दिवसांपासून राजधानीत संततधार सुरु आहे. मंगळवारी देखील काही प्रमाणात पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.