प्रतिनिधी / कणकवली:
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 116 व्या जन्मोत्सव सोहळय़ाला रविवारपासून भक्तीमय वातावरणात येथे प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बाबांच्या उत्सवाने कणकवली शहर भालचंद्रमय झाले आहे.
पहाटे समाधीपूजन, काकड आरतीपासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान भक्तांच्या गर्दीने फुलून गेले. परमहंस भालचंद्र दत्तयाग या धार्मिक विधीस राजू महेंद्रकर, सौ. महेंद्रकर दाम्पत्य तसेच ब्रह्मवृंद व संस्थान अध्यक्ष सुरेश कामत, संस्थान सदस्य, भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती व दुपारी महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला. दुपारपासून 4 वाजेपर्यंत विविध सुश्राव्य भजने झाली. सायंकाळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. उत्सवानिमित्त समाधीस्थळ फुलांनी तर परिसरात मंडप, विद्युत रोषणाईनी सजविण्यात आले आहे. तसेच रवीराज चिपकर या कलाकाराने साकारलेले भालचंद्र बाबांचे वाळूशिल्प जयंत्युत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.
तीन दिवस चालणाऱया बाबांच्या जन्मोत्सव सोहळय़ाचा लाभ घेण्याचे आवाहन भालचंद्र संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.