मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेच्या निमित्ताने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते अशा प्रकारचा आरोप करून खळबळ माजवून दिली. या प्रकरणात त्यांनी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत असे न्यायालयाने सुनावले आहे. हे सर्व घडत असताना राज्यात रोज एक नवा गौप्यस्फोट एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) किंवा अति वरि÷ पोलीस अधिकाऱयांकडून केला जातो. त्याला उचलून धरत विरोधी पक्षाकडून महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाते. तर सत्ताधारी महा विकास आघाडीकडून अधिकारी कसे एका राजकीय विचारधारेशी निगडित आहेत हे सांगत, विविध पुरावे आणि घटनांचा हवाला देत त्यांच्या आरोपातील हवा काढण्याचा प्रयत्न केला जातो. हा आता रोजचा खेळ झालेला आहे. एकाने आरोप करायचा, दुसऱयाने तो फेटाळून लावायचा. दोघांनी एकमेकांची खिल्ली उडवायची. आधीचा आरोप पडतो असे दिसले की तपास यंत्रणेने नवा एखादा गौप्यस्फोट करायचा आणि पुन्हा नव्या दमाने सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकावर तुटून पडायचे. आता यात एनआयएच्या विरोधात महाराष्ट्र एटीएसही(दहशतवाद विरोधी पथक) उभे राहिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेला तपास आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने केलेला तपास असे तपासाचे दोन ध्रुव दिसू लागले तर आश्चर्य वाटून घेता येणार नाही. कारण, दोन्ही बाजूंना आपल्या बाजूचे सत्य पुढे आणायचे आहे. गेला आठवडाभर महाराष्ट्र हेच पाहतो आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर बरीच चर्चा झाली आणि अखेर आपला मुद्दा घेऊन त्यांना न्यायालयाच्या दारात जावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना मुंबई उच्च न्यायालयात पाठवले असून येथेही तपास केंद्रीय यंत्रणेने करायचा की राज्याच्या यंत्रणेने की निवृत्त न्यायाधीशांनी यावरच मोठा खल होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे हा मुद्दा थोडा बाजूला पडताच गाजत आहे तो राज्यातील एक वरि÷ पोलीस अधिकारी रश्मी अवस्थी-शुक्ला यांनी सादर केलेले बदल्यांसाठी दलाली होत असल्याचे सहा जीबीचे कॉल रेकॉर्ड. पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांना त्यांनी हा पुरावा पाठविल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांचा उल्लेख केलेले पत्रही जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल विरोधी पक्ष नेत्यांच्या हाती कोणी सोपवला आणि तो प्रसार माध्यमात कसा पसरला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र तो घेऊन फडणवीस केंद्रीय गृह सचिवांना भेटून आले. त्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही भेटून या प्रकरणी मुख्यमंत्री मौन का आहेत याचा जाब राज्यपालांनी विचारावा अशी मागणी केल्याचे सांगितले आहे. ज्या काळात सचिन वाझे देशमुख यांना भेटला असे परमबीर सिंग सांगत आहेत त्या काळात ते कोरोनामुळे दवाखान्यात उपचारासाठी दाखल होते, दवाखान्यातून बाहेर पडताना त्यांनी दारातच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर ते अलगीकरणात राहिले. म्हणजे वाझे आणि मंत्र्यांचे परमवीर सिंग यांनी दिलेल्या तारखांना बोलणे झाले नाही असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे रश्मी अवस्थी शुक्ला यांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दरम्यान फडणवीस यांच्या वक्तव्यावर टीका करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्ला यांचा अहवाल म्हणजे ‘भिजलेला लवंगी फटाका’ असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्ष नेते वारंवार आरोप करत आहेत आणि ते खोटे पडत आहेत असे राऊत यांनी सूचित केले आहे. राष्ट्रवादीने शुक्ला यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनवू नये म्हणूनही फोन टॅपिंग केले होते त्याची शिक्षा म्हणून त्यांना सरकारने महत्त्वाच्या पदापासून बाजूला केले आहे अशी टीका राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केली होती तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीररित्या टॅपिंग केल्याचा आरोप केला होता. पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांनी कोरेगाव भिमा प्रकरणांमध्ये चुकीचा तपास करून अर्बन नक्षल म्हणून काही विचारवंतांना गुंतवले. पुढे सत्तांतर होताच हा तपास केंद्र सरकारने घाईने एनआयएकडे सोपवला आणि त्यांनी बनावट पुरावे हॅकर्सच्या मदतीने सादर केल्याचे उघडकीस आले असून परदेशी वृत्तपत्रांनीही त्याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. अशा चर्चेने रश्मी शुक्ला या संघ विचाराच्या अधिकारी असल्याचे उघड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे तर उस्मानाबाद जिह्यातील ज्या एजंटने फोन संभाषणात दावा केला त्या अप्पर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांनी आपली बदली दलाल दावा करतो त्यापूर्वीच झाली होती आपण त्याला भेटलोही नाही असा खुलासा केला आहे. अशीच अन्य प्रकरणे ही सरकारी पक्ष जाहीर करत असल्याने त्या मुद्यातील हवा काढण्याचा जोराचा प्रयत्न सुरू असून त्यामुळेच राऊत यांनी भिजलेला लवंगी फटाका अशी संभावना केली आहे. हे सारे घडत असतानाच आता एक कथित डायरीसुद्धा प्रकरण तापवण्यासाठी अवतीर्ण होण्याच्या तयारीत आहे. राजकारणात अशा प्रकारच्या अनेक डायऱया यापूर्वी अवतीर्ण झाल्या आहेत. आता नव्याने ही डायरी आणि एका मंत्र्याचे नाव चर्चेत आणले जाणार आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोरदारपणे केली जाणार आहे. पण, या सर्व बातम्यांना बऱयाच अंशी तात्कालिकता असते मात्र त्यातून साध्य काहीच होत नाही. केवळ तात्कालिक हलकल्लोळाखेरीज हाती काहीच लागत नाही. आज तरी नेत्यांना नव्या मुद्यात भिजलेली लवंगी फटाकडी दिसते तर विरोधकांना बाँब दिसतो आहे. प्रत्यक्षात हे काय आहे हे समजायला खूपच वेळ जाणार आहे.
Previous Articleपालिकेच्या लेट लतिफांची धरपकड
Next Article वाहन कंपन्या किमती वाढविण्याच्या तयारीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.