जगभरातील सर्व देशांमधील कोरोना संसर्गाला आता जवळजवळ एक वर्ष होत आले आहे. भारतासारख्या काही देशांमध्ये संसर्ग वेग थोडा मंदावला आहे तर युरोप अमेरिकासारख्या देशांमध्ये आता दुसरी लाट येण्याची भीती वैज्ञानिक व्यक्त करीत आहेत. भारत अमेरिकासहित सर्व देशातील लोक लस केव्हा बाजारात येईल याची आतुरतेने वाट पहात आहेत. लोक घरात बसून बसून कंटाळले आहेत. काही देशांमध्ये एकाकीपणामुळे कौटुंबिक कलह, घटस्फोट, मानसिक रोग, आत्महत्या इत्यादींचे प्रमाण वाढले आहे. अनेक देश आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आले आहेत. परिस्थिती पूर्वपदाला येण्यासाठी कमीत कमी 5 वर्षे तरी लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व परिस्थितीकडे पाहता आपण थोडासा गहन विचार केल्यास आपल्याला दिसून येते की लोकांमध्ये आपला जीव कसा वाचवायचा यासाठी वैयक्तिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशातील सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. याचा अर्थ आपला जीव किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळते, म्हणूनच कोरोनाची भीती आपल्याला वाटते. पण आपल्याला माहीत आहे का, जागतिक आरोग्य संघटनेनुसार दररोज दीड लाख लोक निरनिराळय़ा कारणाने मृत्युमुखी पडतात, त्यात कोरोनाने मरणाऱयांची संख्या 10 टक्केसुद्धा नाही. तरीपण कोरोनाची दहशत जनमानसात बसलेली आहे. याचे कारण मृत्यू हे आहे. कोणालाही मरायला आवडत नाही पण ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे, हे भयानक सत्य आहे. पण मृत्यूपासून आपण कायमचे कसे मुक्त होऊ याचा कोण विचार करताना दिसत नाही. महाभारतमधील एका प्रसंगात यक्ष युधिष्टिर महाराजांना एक प्रश्न विचारतो की या जगामध्ये सर्वात मोठे आश्चर्य कोणते. या रहस्यमय प्रश्नाचे उत्तर देताना युधि÷िर महाराज सांगतात
अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम्। शेषाः स्थावरमिच्छज्न्त किमाश्चर्यमतःपरम् ।
अर्थात दररोज आपण लाखो लोक मृत्युमुखी पडताना पाहतो, ऐकतो तरीही लोक या जगातच आपल्याला राहावयाचे आहे असे वागतात, याहून दुसरे मोठे आश्चर्य नाही. या श्लोकाचा मथितार्थ हा आहे की आपण ‘मृत्यू’ कडे सामान्य किंवा दररोज घडणारी घटना म्हणून दुर्लक्ष करू नये. त्यासाठी भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिली आहे. या बुद्धीचा वापर या मनुष्यजन्मात आपण करून मृत्यूपासून कायमचे कसे मुक्त व्हावे याचा विचार करावयास हवा. अन्यथा आपण स्वतःचीच फजिती करून घेत आहोत व मनुष्य जन्म म्हणून मिळालेली संधी वाया घालवत आहोत. आपल्याला येणाऱया मृत्यूची भीती ही असलीच पाहिजे पण त्यासाठी उपाय काय आहे हे आपण संत तुकाराम महाराजांसारख्या अनुभवी, साक्षात्कारी संतांकडून समजून घेतले पाहिजे. ते एका अभंगात सांगतात्।
किती वेळा जन्मा यावे । नित्य व्हावे फजित ।।1।।
म्हणऊनि जीव भ्याला ।शरण विठोबासी गेला ।।2।।
अर्थात किती वेळा या नश्वर जगात जन्माला यावे आणि स्वतःची फजिती करून घ्यावी, म्हणून माझा जीव घाबरला आणि विठोबाला शरण गेला. विठोबा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आपल्याला मृत्युसागरातून अर्थात पुनः पुन्हा येणाऱया मृत्यूपासून कायमचे मुक्त करू शकतात आणि भग्वदधामामध्ये जाण्याचा आपला मार्ग सोपा करून देतात. ही संधी कोणाला व कशी प्राप्त होते याचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण सांगतात,
ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा: । अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते । तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् । अर्थात जे माझे पूजन करतात, जे आपली कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्यभावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा, हे पार्था, मी जन्म मृत्युरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. मनुष्याने केवळ श्रीकृष्णप्रीत्यर्थच कर्म करावे व त्यांना संतुष्ट करणे हेच जीवनाचे ध्येय असावे. सद्यस्थितीत आपण स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि अशा प्रयत्नाने इंद्रिये कधीच संतुष्ट होणार नाहीत म्हणून भगवदगीतेतील आज्ञेनुसार कर्म केल्यास आपल्या इन्दियांना संतुष्टी तर मिळतेच आणि भगवंतही अशा समर्पितवृत्तीने संतुष्ट होतात. म्हणून बुद्धिमान व्यक्तीने आपल्या जीवनात श्रीकृष्ण भक्तीला प्राधान्य द्यावे.
जन्म घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्या ना कोणत्या कारणाने निश्चितच येणार पण त्याआधी त्याची तयारी कशी करावी हेच आपल्याला भगवद्गीता शिकविते. ज्यांनी जीवनामध्ये श्रीकृष्ण भावना भवित होण्याचा प्रयत्न केला आहे त्याला मृत्यूच्या वेळीही श्रीकृष्ण निश्चितच आठवतील. म्हणूनच हिंदू धर्मीयांमध्ये पद्धत आहे की मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मुखामध्ये गंगाजल व तुळशीची पाने ठेवली जातात. याचा अर्थ गंगा नदी विष्णूच्या चरणापासून वाहते व तुळशी कायम विष्णूच्या चरणाशी असते म्हणून त्या व्यक्तीला वैकुंठ प्राप्ती व्हावी ही त्याच्या नातेवाईकांची इच्छा असते. पण हा बाह्य उपाय झाला, तर मृत्युसमयी आपण काय केले पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण सांगतात अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
य: प्रयाति स मद्भ?ावं याति नास्त्यत्र संशय: ।
अर्थात अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो, तो तात्काळ माझ्या प्रकृतीची ‘वैकुंठाची’ प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. जीवात्मा मृत्यूच्या वेळी जे चिंतन करतो त्याप्रमाणे त्याला पुढील देह प्राप्त होतो. म्हणून मनुष्य जीवनातील सर्व क्रिया भगवंताच्या आदेशानुसार केल्यास मृत्यूसमयी आपण भगवंताचे स्मरण करू शकू. परिणामी जिथे कुठल्याही प्रकारचे दु:ख नाही असे वैकुंठ धाम आपण प्राप्त करू शकू. संत तुकाराम महाराज खालील अभंगातून याच भक्तिमार्गाचा उपदेश करीत आहेत.
जन्मा येऊनि काय केले । तुवा मुद्दल गमावले ।।1।। का रे न फिरशी माघारा । अझुनी तरी फजितखोरा ।।2।। केली गाठोळीची नासी । पुढे भीकची मागसी ।।3।।तुका म्हणे ठाया । जाई आपुल्या आलिया ।।4।।
अरे मानवा, जन्माला येऊन तू काय केलेस? आयुष्यरूपी मुद्दलच तू व्यर्थ घालवलेस. तू परत का अजुनी फिरत नाहीस, वैकुंठाला का जात नाहीस? किती वेळा जन्माला येऊन फजिती करून घेणार? या जगातील इंद्रिय भोगातच आयुष्य घालवलेस तर तुला जन्मोजन्मी क्लेश भोगावे लागणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात जेथून या जगात आलास त्या मूळ ठिकाणी वैकुंठाला परत जा. कोरोनाचा संसर्ग आज ना उद्या निघूल जाईल पण मृत्यूपासून आपण स्वतःला कधीच वाचवू शकणार नाही. तरी मृत्यू येण्यापूर्वी बुद्धिमान व्यक्तींनी याचा विचार जरूर करावा व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा तरच दुर्मिळ मनुष्यजन्म सार्थकी लागेल आणि मृत्यूचे भयही राहणार नाही.
वृंदावनदास