प्रतिनिधी/ आनेवाडी
पुणाबंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याजवळ रविवारी सकाळी कंटेनर व दुचाकीचा जोरदार अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील महिलेला कंटेनरने फरफटत नेल्याने ती जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस स्थानकामध्ये झाली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनेवाडी टोलनाक्याचा जवळच दुचाकीवरून जात असलेल्या मधुकर पटवर्धन यांच्या दुचाकीला अचानक कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये पत्नी विद्या मधुकर पटवर्धन (वय 65, रा. मिरज- सांगली) या जागीच ठार झाल्या आहेत. तर मयत महिलेचे पती मधुकर गोविंद पटवर्धन गंभीर जखमी झाले आहेत.
आनेवाडी टोलनाक्याजवळ विरमाडे गावच्या हद्दीत रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. पटवर्धन दांपत्य दुचाकीवरून (क्रमांक एन. एल. 01 क्यु- 6794) पुण्याच्या दिशेला निघाले होते. त्यावेळी दुचाकीला विरमाडे गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक देऊन कंटेनरने दुचाकीला फरफटत नेले.
अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात पत्नी जागीच ठार झाली असून पती जखमी झालेले आहेत. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती, पोलिसांनी ती तात्काळ धाव घेऊन वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले व नंतर घटनास्थळी पंचनामा केला.