कॉर्नर सभा घेऊन निवडून देण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभारलेल्या भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी गोकाक तालुक्मयातील नरसा, सुन्याळ, औरादी, मुद्देनूर, बटकुर्की, हलगत्ती, संगळ यासह इतर गावांमध्ये जोरदार प्रचार केला. विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
भाजपने आजपर्यंत तळागाळातील आणि ग्रामीण भागातील विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भारत समृद्ध व्हावा या दृष्टिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आणल्या आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी ज्या योजना अंमलात आणल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जो कायापालट झाला आहे तो केवळ नरेंद्र मोदी यांनीच केला असून त्यांच्या पाठिशी ठामपणे जनतेने उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजप पक्षाने आजपर्यंत कृषी, औद्योगिक, शिक्षण विकासाचा कायापालट केला आहे. मात्र काही जण भाजपला बदनाम करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तेंव्हा जनतेने सावध राहून त्याचा पूर्ण अभ्यास करून आम्हाला मतदान करावे, असे त्यांनी सांगितले. या सर्व गावांमध्ये घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला आहे. सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. सोमवारी गोकाकसह इतर भागामध्ये प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत उज्ज्वला बडवाण्णाचे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.