प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण, उत्तर-दक्षिण मतदार संघांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी सर्वसामान्य जनतेला केले आहे. महागाईमुळे आम्ही त्रस्त झालो आहे. तेव्हा महागाईपासून दूर व्हायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. तेव्हा बेळगावमधूनच याची सुरुवात करण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले.
आता प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून प्रत्येक जण मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. काँग्रेसने तर जोरदार प्रचार सुरू केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदार संघांमध्ये त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून काँग्रेसला सर्वत्र पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकजुटीने प्रचार
सोमवारी ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण मतदार संघांमध्येही काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. विविध समाजाने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसही आता जोरदार टक्कर देताना दिसत आहे. सध्याची निवडणूक ही भाजप, काँग्रेस आणि म. ए. समितीमध्ये होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचार करत आहेत. यावेळी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.