प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारचा दिवस असूनही शहराची बाजारपेठ पूर्णतः कार्यरत राहिली. 43 दिवसांच्या लॉकडाऊननंतर काही दिवसांसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने सध्या बाजारपेठेत नेहमीच गर्दी होत आहे. बेळगाव बाजारपेठेत म्हणजेच नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, झेंडा चौका, कांदा मार्केट येथे सातत्याने गर्दी दिसत आहे.
प्रदीर्घ काळाचे लॉकडाऊन आणि समोरच येऊन ठेपलेला पावसाळा या पार्श्वभूमीवर सध्या धान्य साहित्याची बेगमी करून ठेवण्यात प्रत्येक जण गर्क आहे. त्यामुळे सकाळी 9.30 पासूनच बाजारपेठेत गर्दी होत आहे. वर्षभराच्या धान्याची खरेदी होत आहे. शिवाय पुन्हा मिरची बाजाराला चांगले दिवस आले आहेत. लाल मिरच्यांची खरेदी महिलावर्ग अधिक प्रमाणात करतो आहे. त्यासोबत मसाल्याच्या साहित्याचीही खरेदीही होत आहे. परंतु मसाल्याचे दर वाढल्याने काटकसर करावी लागत आहे.
धान्य बाजारपेठेप्रमाणेच फळ बाजाराला बहर आला आहे. सध्या बाजारपेठेत सर्वत्र कलिंगड, अननस, आंबे, केळी यांची आवक वाढलेली दिसते. त्याचप्रमाणे हळूहळू सर्वच दुकाने खुली झाली आहेत. आइस्क्रीम पार्लर्स सुरू झाली असून पावसाळा सुरू होईपर्यंतच काय तो व्यापार होईल, असे पार्लर चालकांचे म्हणणे आहे. धान्याची बाजारपेठ सुरू झाली तरी वस्त्रप्रावरणांच्या दुकानांना चार दिवसांपासूनच परवानगी मिळाल्याने मंगळवारी सुटी न घेता त्यांनी दुकाने खुली ठेवली.
दरम्यान, वस्त्रप्रावरणांच्या दुकानात इच्छा असूनही नागरिकांना नियमांमुळे खरेदी करणे कठीण होत आहे. बहुसंख्य दुकानदारांनी ‘नो ट्रायल, नो एक्स्चेंज, नो रिटर्न असे फलक लावल्याने खरेदी करणाऱयांची कोंडी झाली आहे. एखादा पोषाख पसंत पडला नाही तर तो परत करून दुसरा घेण्याची मुभा होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी असे फलक लावले आहेत. अर्थात हे नियम सरकारनेच घालून दिले आहेत. त्यामुळे दुकानदारांचाही नाईलाज आहे.
एकूणच जवळजवळ दीड महिना स्तब्ध झालेले शहर पुन्हा एकदा गतिमान होत आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठच्या सुटीदिवशीही क्यापाऱयांनी सुटी टाळून व्यापार करणे पसंत केले.