तरुण भारत संवाद
मंगळवेढा/वार्ताहर
मंगळवेढा येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरूणा माळी, नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, 13 नगरसेवक असा त्रिकोट आंदोलनाचा सामना एकमेंकावर आरोप करीत रंगला आहे. हे आंदोलन दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सूरू झाले आहे. दरम्यान या आंदोलनात नगरपालिकेच्या सर्वच कर्मचार्यांनी उडी घेतल्याने आज, सोमवारी कामकाजाचा दिवस असूनही कामकाज होऊ शकले नाही. नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शभंकर यांनी गार्भीय पूर्वक लक्ष घालून आंदोलन तात्काळ मिटवावे अशी मागणी जनतेमधून होत आहे.
नगराध्यक्षा अरूणा माळी ह्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मनमानी व भ्रष्ट कामकाजाबाबत आंदोलन करीत असून याची संपूर्ण चौकशी करून त्यांना निलंबीत करावे अशी त्यांची मागणी आहे.
फॉर्म नं. 64 वर नगराध्यक्षा यांची स्वाक्षरी घेणे बंधकारक असताना ती न घेता अंदाजे 2 कोटी रूपयीचे बिले परस्पर अदा केल्याचा नगराध्यक्षा माळी यांचा आरोप आहे. घंटा गाडी चालकाची निविदा न काढता दुसर्या ठेक्यातून बिले काढून कर्मचार्यांच्या पी.एफ च्या रकमेत भ्रष्टाचार केल्याचे नगराध्यक्षा माळी यांचे म्हणणे आहे. संगणक ऑपरेटर व पुरवठा ठेक्यातील कर्मचारी स्वतःच्या गाडीवर चालक म्हणून वापरत आहेत. आवक जावक विभागात झिरो कर्मचारी नेमूण टक्केवारी वर वसुली केली जात आहे. या व अन्य गंभीर स्वरूपात आरोप नगराध्यक्ष माळी यांनी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यावर केले आहेत.
तर, नगराध्यक्षा अरूणा माळी ह्या मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप 13 नगरसेवकांचा असून त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. नगराध्यक्षांचे पती कर्मचार्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. तर, नगरपालिकेतील कर्मचारी नगराध्यक्ष माळी यांच्या खोट्या तक्रारीच्या त्रासास कंटाळून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात स्वच्छता विभाग पाणीपुरवठा विभाग यासह अन्य विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
यासाठी नगरपालिकेच्या दोन्ही गेटवर एका बाजूला नगराध्यक्ष माळी दुसर्याबाजूला 13 नगरसेवक तर कार्यालयाच्या आतील बाजूस सर्व कर्मचारी आंदोलनास बसले आहेत. गेली दोन दिवस हे आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणीच आंदोलनाकडे फिरकले नाहीत. नगरपालिकेतील कर्मचार्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे सोमवारी कार्यालयीन कामकाज दिवसभर ठप्प होते. सोमवार मंगळवेढ्याचा आठवडे बाजार तसेच आठवड्यातील पहिल्या दिवसाची कार्यालयीन सुरूवात असल्याने नागरीक कामानिमित्त नगरपालिकेडे चकरा मारत होते. मंगळवेढ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष विरूद्ध कर्मचारी व नगरसेवक असा तिंरगी आंदोलनाचा सामना रंगल्याने संपूर्ण जिल्ह्याचे इकडे लक्ष लागले आहे.
सध्या तरी आंदोलन मिटवण्यासाठी प्रशासन पातळीवर कुठलाही प्रयत्न न झाल्यामुळे मंगळवारच्या कार्यालयीन कामकाजाचे काय होणार याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे. या कर्मचारी आंदोलनाला नेमकी फुस कोणाची? असा प्रश्न नागरीक करीत असून कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्यामुळे जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोपी शहरवांसीयांमधून होत आहे.