प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून नूतन मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आले आहे. या दरम्यान मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदार नाराज झाले आहेत. आमदार सी. पी. योगेश्वर, आर. शंकर, श्रीमंत पाटील यांनी दिल्ली दौरा हाती घेतला आहे. त्यांच्यासमवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळीदेखील असल्याने राजकीय वर्तुळात कुतुहल निर्माण झाले आहे.
मंत्रिपदाचे दावेदार असताना देखील डावलण्यात आल्याने आमदार सी. पी. योगेश्वर, आर. शंकर, श्रीमंत पाटील यांच्यासमवेत रमेश जारकीहोळी दिल्लीला गेले असून वरिष्ठांची भेट घेणार आहेत. सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावून देखील आपल्याला डावलण्यात आल्याची तक्रार ते भाजप श्रेष्ठींकडे करणार आहेत, असे समजते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी आपले बंधू भालचंद्र जारकीहोळी आणि आपले निकटवर्तीय श्रीमंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने रमेश जारकीहोळी हायकमांडवर दबाव आणणार असल्याचे समजते.
प्रीतम गौडाही नाराज मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप आमदार प्रीतम गौडा हे देखील नाराज झाले आहेत. त्यांनी मंगळवारी निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी प्रीतमगौडा यांना फैलावर घेतले. येडियुराप्पा यांनी त्यांची झडती घेताना मुख्यमंत्र्यांविषयी जाहीरपणे बोलणे तुम्हाला शोभत नाही. अडचणी असतील तर त्या पक्षपातळीवर सोडविता येतील, अशा कानपिचक्या दिल्या.