बाचणी येथे दुर्घटनाग्रस्त जाधव कुटुंबीयांना मुश्रीफ फाउंडेशनकडून एक लाखाची मदत…….
व्हनाळी / वार्ताहर :
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरीब व संकटग्रस्त जनतेचे आधारवड आहेत, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. बाचणी ता. कागल येथील दुर्घटनाग्रस्त जाधव कुटुंबियांना मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने श्री. पवार व गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते एक लाखांची ठेव पावती देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, आठवड्यापूर्वी कपडे धुण्यासाठी गेल्यावर अकरा केव्ही उच्च दाबाची वीजवाहिनी अंगावर पडून सौ. गीता गौतम जाधव, वय -३२ व कु. हर्षवर्धन गौतम जाधव, वय -१२ या मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. थोड्याच अंतरावर असलेली कु. भक्ती ही अवघ्या आठ वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली होती. या दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या कुटुंबीयांचे सांत्वन करून आकस्मिक मदतीसह भक्तीच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने एक लाख रुपयांची ठेव केडीसीसी बँकेत ठेवून ठेव पावती देण्यात आली. दामदुप्पट ठेवीची रक्कम दोन लाख होणार आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, निवास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
नाळ जनतेशी
आमदार पवार म्हणाले, जनतेवर कोणतेही संकट आले की मंत्री हसन मुश्रीफ त्यांना हिमालयाएवढा आधार देण्यासाठी धावून जातात. सर्वसामान्य, गोरगरीब जनता हाच त्यांचा गोतावळा झाला आहे. गोरगरीब जनतेशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे.