नवरात्रोत्सव संपताच मांसाहारला पसंती
प्रतिनिधी /बेळगाव
नवरात्रोत्सव संपल्यानंतर मांसाहार खाणाऱयांची संख्या वाढली आहे. नवरात्रोत्सव काळात बरेचजण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे मासे, चिकन, मटण, अंडी यांची मागणी घटली होती. मात्र शुक्रवारी विजयादशमी संपल्यानंतर शनिवारपासून मांसाहारला पसंती देत आहेत. कसाई गल्ली येथील फिश मार्केटमध्ये देखील माशांची मागणी वाढली आहे. माशांची आवक काही प्रमाणात कमी असल्याने दर काहीसे वाढले आहेत.
फिश मार्केटमध्ये बांगडा 130 ते 140 रुपये किलो, सुरमई 450 ते 500 रुपये किलो तर पापलेट 500 ते 600 रुपये किलो, याबरोबरच झिंगे 300 ते 400 रुपयाने विक्री होत होते. नवरात्रोत्सव संपताच मटण, चिकन, मासे आणि अंडय़ांच्या मागणीत वाढ झाली आहे.
तसेच हिवाळा तोंडावर आल्याने अंडय़ांची मागणी वाढली असून, दरात देखील वाढ झाली आहे. मासे आणि मटणाचे दर अधिक असल्याने खवय्ये चिकनला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे चिकनची मागणी देखील वाढली आहे.