मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा आयआयटीसाठी तज्ञांची समिती स्थापणार
प्रतिनिधी / मडगाव
स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्येक युवकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. त्यामुळे सरकार तर्फे स्वामी विवेकानंद यांचा पहिल्यांदाच युवा सप्ताह साजरा करण्यात आला. यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू व ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करण्याकरिता स्वामी विवेकानंद गोव्यात आले होते. तेव्हा ते मडगाव येथे थांबले होते. स्वामी विवेकानंद गोव्यात येऊन गेले याची माहिती प्रत्येक युवकांपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल. गेल्या 130 वर्षापासून स्वामी विवेकानंद यांनी वापरलेली प्रत्येक वस्तू इथे योग्य पद्धतीने सांभाळून ठेवण्यात आलेली आहेत. स्वामी विवेकानंद मडगाव येथे येऊन गेले होते, त्यामुळे मडगाव रवींद्र भवनमध्ये स्वामी विवेकानंद केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मडगावच्या ‘दामोदर साल’ येथे ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद थांबले होते, त्या जागेची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक, भाई नायक व इतरांची उपस्थिती होती.
आयआयटी साठी चार तज्ञांची समिती स्थापणार
गोव्यात आयआयटी होणे अत्यंत गरजेचे आहे. शेळ-मेळावलीतून सदर प्रकल्प इतर ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारतर्फे चार तज्ञ लोकांची एक समिती निवडण्यात येईल. ही समिती आयआयटीसाठी योग्य जागा निवडेल. आम्हाला लोकांना त्रास द्यायला नको असून त्यामुळे सदर समितीची निवड करण्यात येणार आहे. भाजप सरकार हे लोकांचे हित बघून काम करणारे सरकार आहे. ज्या लोकांनी गोवा विकायला काढला होता अशा नेत्यांनी मला शिकविण्याची गरज नाही. आज भाजप सरकार स्वयंपूर्ण गोवा बनवण्याच्या मार्गाने चालत आहे. काही नेत्यांना चांगली कामे करणारे सरकार नको असून त्यामूळे ते लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच आज जे नेते लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहे, त्याच नेत्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गोव्याला लुटण्याचा प्रयत्न केला होता असे मुख्यमंत्री म्हणाले.
जनमत कौल दिनानिमित्त कोरोना लसीकरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनमत कौल दिन साजरा करण्यापेक्षा कोरोना लसीकरण कार्यक्रम अत्यंत महत्वाचा होता. कारण, आम्हाला जनतेच्या आरोग्याची काळजी आहे. इतर नेत्यांना जनतेच्या हिताचे पडून गेलेले नाही. तसेच गोव्याचा प्रत्येक इतिहास टिकून ठेवण्याचे प्रयत्न सरकार करेल. पुढच्या वर्षापासून सरकारतर्फे जनमत कौल दिन मोठय़ा उत्साहाने साजरा केला जाईल. जनतेला भाजप सरकारवर विश्वास असून त्यामुळे डिसेंबरमध्ये झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्याच पद्धतीचा प्रतिसाद नगरपालिकेच्या निवडणुकीत लाभणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.