कंत्राटदाराचा प्रताप : येळ्ळूरमधील प्रकाराने पंचक्रोशीतील चर्चेचा विषय
प्रतिनिधी /येळ्ळूर
रस्ता करायचा असेल तर गटारी केल्या जातात. विजेचे खांब रस्त्यावर असतील तर ते हटविले जातात. मात्र, येळ्ळूरमधील द्वारकानगरमध्ये चक्क रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब असतानाही पक्का रस्ता करण्यात आल्याने येळ्ळूर पंचक्रोशीमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. आता या प्रकाराला कुणाला दोष द्यायचा? असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे.
आमदार फंड असो किंवा ग्राम पंचायतीचे अनुदान असो, विकास हा सर्वसामान्य जनतेच्या पैशातूनच होत असतो. बऱयाच वेळा राजकारण करतच हा निधी खर्च केला जातो. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा मात्र दुरुपयोग होत आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या अखत्यारित येणाऱया अवचारहट्टी रोडवरील द्वारकानगर, सेकंड क्रॉस येथे हा प्रकार घडला आहे. किमान हा रस्ता करताना कंत्राटदाराने तरी याचा विचार करायला हवा होता. रस्ता झाला परंतु वाहने कशे या रस्त्यावरून ये-जा करणार हे समजले नाही.
अशा प्रकारे निधी मिळवायचा आणि सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा करायचा. हा प्रकार खरोखरच अशोभनीय आहे, अशी चर्चा या परिसरात सुरू आहे. हेस्कॉमचे खांब हटविणे यासाठी खर्च येतोच. हेस्कॉमकडे पाठपुरावा केला पाहिजेच. तो करून खांब हटवून त्यानंतर रस्ता करणे महत्त्वाचे होते. मात्र कोणताही विचार न करता रस्त्याच्या मध्ये विजेचा खांब ठेऊन काँक्रीटचा रस्ता झाला. मात्र वाहने कशी ये-जा करणार? असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे. या प्रकाराकडे आता ग्राम पंचायत अधिकारी लक्ष देणार का? हा प्रश्न साऱयांनाच पडला आहे.
ग्रामस्थांतून तीव्र नाराजी
येळ्ळूरचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे नवनवीन नगरे होत आहेत. गोरगरीब जनता कमी दरामध्ये प्लॉट खरेदी करत आहेत. पोटाला चिमटा लावून घरे बांधत आहेत. मात्र, त्याला ग्राम पंचायत विरोध करत आहे. याबद्दल ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक विस्तार करत असताना ग्राम पंचायतीने संबंधित जागा मालकाकडून योग्य शुल्क घेऊन ग्राम पंचायतीचा कर वाढविणे महत्त्वाचे आहे. मात्र, यापुढे अनधिकृत वसाहतीच करू देणार नाही, असा आग्रह धरणे योग्य नाही. याबद्दल काही ग्राम पंचायत सदस्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यामध्ये असलेल्या खांबांवरून सध्या वेगवेगळय़ा चर्चा सुरू आहेत.