उमेदवारांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला आहे. व्हीव्हीपॅट बसविण्यात आले नाहीत. अनेकांची नावे 3 ते 4 वेळा मतदार याद्यांमध्ये दाखल करण्यात आली आहेत. यामुळे ही निवडणूक पारदर्शक झाली नाही. तेव्हा पुन्हा महापालिकेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवडणूक लढविलेले उमेदवार मोतेश बारदेशकर आणि मुक्तार इनामदार यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
महापालिकेची निवडणूक अत्यंत घाईगडबडीत घेण्यात आली. मतदारयाद्यांमध्ये मोठा गोंधळ करण्यात आला. अनेकांची नावे कमी करण्यात आली नाहीत, तसेच काही जणांची नावे जाणूनबुजून गाळण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ईव्हीएम यंत्राद्वारे निवडणूक घेताना व्हीव्हीपॅट जोडणे बंधनकारक आहे. असे असताना बेळगावमध्येच व्हीव्हीपॅट का जोडले गेले नाही? असा प्रश्नही त्यांनी निवेदनामध्ये उपस्थित केला आहे.
महापालिकेची निवडणूक पारदर्शक झाली नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून ही निवडणूक घेतली गेली. त्यामुळे पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उमेदवारांसह कार्यकर्तेही उपस्थित होते.