- चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल
ऑनलाईन टीम / मुंबई :
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. स्फोटके ठेवून गाडी घराबाहेर कुणी उभी केली, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणालाच नाट्यमय वळण मिळाले असून, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मागील घटनांचा संदर्भ देत सरकारला ठाकरे सवाल केला आहे.
मनसुख हिरेन यांचा मुंब्रातील रेतीबंदर परिसरात मृतदेह आढळून आला. ठाण्यात राहणाऱ्या हिरेन यांची चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्याने आता शंका विरोधकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. याच प्रकरणावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत सरकारकडे निष्पक्ष चौकशीची आशा व्यक्त केली आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.