पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांची सभाः
वृत्तसंस्था / कांथी
पश्चिम बंगालच्या कांथी येथील प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कथित अहंकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. ममतादीदी कुणाचंच ऐकत नाहीत, ममतांच्या हट्टामुळे बंगालचे शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहिले. राज्यात भाजप सरकार येताच सर्व शेतकऱयांना मागील 3 वर्षांचे किसान सन्मान निधीचे हप्ते एकाचवेळी देण्याचे आश्वासन मोदींनी बुधवारी दिले आहे.
प्रत्येक क्रांतिवेळी मेदिनीपूर अग्रगण्य राहिला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याकरता देण्यात आलेले प्रत्येक योगदान भावी पिढय़ांपर्यंत पोहोचविण्यास भाजप सरकारची प्राथमिकता आहे. शोनार बांग्लाचा शंखनाद होताना आता प्रत्येक जण ऐकत आहे. बंगालच्या कानाकोपऱयातून एकच आवाज येत आहे. ‘दो मोई आछे, दीदी जाछे, दीदी जॉछे, ऑशोल परिवर्तन आछे’ (2 मे रोजी दीदींचे सरकार गडगडणार, खरे परिवर्तन होणार) असा आवाज प्रत्येक मुखातून निघत असल्याचे मोदी म्हणाले.
तृणमूलच्या पापांचा घडा भरला
अम्फान चक्रीवादळावेळी देण्यात आलेला मदतनिधी कुणी लुटला असा प्रश्न पश्चिम बंगाल दीदींना विचारत आहे. गरिबांसाठीचा तांदूळ कुणी हडपला? चक्रीवादळग्रस्त अद्याप तुटलेल्या छताखाली का जगत आहेत? गरजेच्या प्रसंगी दीदी का दिसत नाहीत असे प्रश्न विचारले जात आहेत. पश्चिम बंगालमधील लहान मुल्sं देखील तुमचा खेळ जाणून आहे. याचमुळे 2 मे रोजी पश्चिम बंगाल दीदींना सत्तेवरून पायउतार करणार आहे. दीदींच्या तृणमूलचा पापाचा घडा भरला असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
महिला मतदारांवर भर
तृणमूलला या निवडणुकीत शिक्षा करण्यासाठी माता-भगिनी मोठय़ा संख्येत बाहेर पडत आहेत. दीदी तुम्ही कुणाचं ऐकत नाही, पण या सभेला झालेली गर्दी पाहू शकता. तृणमूलचा खेळ मोडून काढत बंगालच्या विकासाचा आरंभ करण्याचा निर्धार राज्यातील महिलांनी केला असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
बॉम्ब-बंदूक, हिंसाचारापासून मुक्ती
ममतादीदींच्या शासनकाळात येथे हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांच्या बातम्या येत असतात. स्फोटांमुळे पूर्ण घर उद्ध्वस्त होते आणि ममतांचे सरकार केवळ पाहत राहते. ही स्थिती आम्हा सर्वांना मिळून बदलावी लागेल. बंगालला शांतता हवी, स्थैर्य हवे, बॉम्ब-बंदुका आणि हिंसाचारापासून मुक्ती हवी असे मोदींनी म्हटले आहे.
सभेत अनोखे दृश्य
सभेदरम्यान भाजपचा एक कार्यकर्ता मोदींच्या पाया पडण्यासाठी पुढे येत होता. हे पाहून मोदींनी त्याच्या दिशेने जात त्याला वाकून नमस्कार केला तसेच त्याला उभे करून त्याच्या पायांना स्पर्श केला आहे. भाजपने या घटनेची चित्रफित प्रसारित करत याला ‘संस्काराची भावना’ ठरविले आहे. भाजप एक सुसंस्कृत संघटना असून येथे कार्यकर्त्यांमध्ये परस्परांबद्दल सन्मानाची भावना असते असे भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नमूद करण्यात आले आहे.