भाजपाध्यक्ष नड्डा यांचा हल्लाबोल : राज्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी द्यावे लागते लाच
वृत्तसंस्था/ वर्धमान
वाहनताफ्यावरील हल्ल्याच्या एक महिन्याने भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा पुन्हा पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पोहोचले आहेत. वर्धमान येथे त्यांनी ‘एक मूठ तांदूळ’ अभियानाचा शुभारंभ केला आहे. या अभियानाद्वारे भाजपने राज्यातील सुमारे 73 लाख शेतकऱयांशी जोडून घेण्याचे लक्ष्य बाळगले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारच्या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार फोफावल्याचा आरोप नड्डा यांनी यावेळी केला आहे. राज्यात अंत्यसंस्कारासाठीही कटमनी (लाच) द्यावी लागत असल्याचे नड्डा म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सत्तेवर येणे आणि ममता बॅनर्जी सत्तेवरून पायउतार होणे निश्चित आहे. बंगालच्या जनतेने भाजपच्या स्वागताचा निश्चय केला आहे. शेतकऱयांसोबत झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून पुढील सरकारचा मार्ग आम्ही मोकळा करू. येथूनच ‘मोदीजी आगे बढो, किसान आपके साथ है’ असा आवाज देशभरात पोहोचणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.
ममतांनी पंतप्रधानांना किसान सन्मान निधीसाठी पत्र लिहिले आहे. भाजपचे सरकार येताच राज्यातील शेतकऱयांना ही योजना मिळवून देणार आहोत. केंद्र सरकारने आणलेले तिन्ही नवे कृषी कायदे शेतकऱयांना स्वातंत्र्य देणारे आहेत. शेतीप्रकरणी 29 राज्यांमध्ये पश्चिम बंगाल 24 व्या स्थानावर आहे. राज्यात पाण्याची कमतरता नाही, तरीही निम्म्या जमिनीला सिंचनाची व्यवस्था प्राप्त नसल्याचे उद्गार भाजप अध्यक्षांनी काढले आहेत.
तृणमूलच्या काळात नारदा, शारदा यासह अनेक घोटाळे झाले. ममतांनी मां, माटी, मानुषसाठी काम करणार असल्याचे म्हटले होते, परंतु त्या तर तोलाबाजी (भ्रष्टाचार) तानाशाही (हुकुमशाही) आणि तुष्टीकरणासाठी काम करत आहेत. त्यांच्या शासनकाळात राज्यात अंत्यसंस्कार करण्यासाठीही लाच द्यावी लागत असल्याची टीका नड्डा यांनी केली आहे.