सुरक्षेत ढिलाईमुळे निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अपघात झाल्याप्रकरणी त्यांचे सुरक्षा अधिकारी विवेक सहाय यांना निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱयाने आपल्या कर्तव्याचे पालन योग्य प्रकारे पेले नाही, असा ठपका ठेवत केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. त्याचप्रमाणे पूर्व मेदिनीपूर जिल्हय़ाचे जिल्हय़ाचे एसपी प्रवीण प्रकाश यांनाही हटविण्यात आले आहे.
नंदिग्राम येथे उमेदवारी अर्ज भरलेल्या ममता बॅनर्जी त्यानंतर झालेल्या अपघातात जखमी झाल्या होत्या. मात्र त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या संबंधीचा अहवाल मागविला होता. तसेच तपासणी करण्यासाठी आपले स्वतःचे निरीक्षक नेमले होते. राज्याचे पोलीस आणि निरीक्षक यांनी पाठविलेल्या अहवालात हा घातपाताचा प्रकार नसून अपघातच असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने रविवारी हा अपघातच असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सुरक्षा अधिकाऱयाने त्याची जबाबदारी योग्य रित्या पार पाडली नाही. ममता बॅनर्जींची व्यवस्था साध्या कारमध्ये करण्यात आली. असा ठपका ठेवत त्याला निलंबित करण्याचा आदेश दिला.
जबाबदारी कोणाची
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. ती निवडणूक आयोगाने स्वतःच्या हाती घेतलेली नाही, हे देखील आयोगाने लगेचच स्पष्ट केले होते. परिणामी, स्वतःच्या सुरक्षेसाठी ममता बॅनर्जी स्वतःच उत्तरदायी आहेत. कारण त्याच राज्याच्या गृहमंत्रीही आहेत. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणते अधिकारी असावेत याची निवड करण्याचा अधिकार त्यांचाच आहे, असे मत अनेक तज्ञांनी नंदीग्राम घटनेनंतर व्यक्त केले. या प्रकाराचे आता राजकारण होत आहे.