ही ममतांची जादू आहे का राजकीय समीकरण, वेगवेगळय़ा राज्यांमध्ये आघाडी असलेल्या राजकीय पक्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मात्र वेगवेगळे गट दिसुन येत आहे. बंगालच्या निवडणुकीची लढाई तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस-डाव्या आघाडीदरम्यान आहे. झारखंडमध्ये झामुमोचे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. पण बंगालमध्ये पोहोचताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काँग्रेस विरोधातच मोर्चा उघडला आहे. काँग्रेस, डाव्यांना मतदान करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सामील आहे. पण शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणुकीत न उतरण्याचा आणि ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँग्रेस-डाव्या आघाडीला साथ देण्यासाठी ममता बॅनर्जींसाठी प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे.
बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस तसेच डाव्या पक्षांमध्ये महाआघाडी आहे. पण राजद नेते तेजस्वी यादव यांनी बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना मतदान न देण्याचे आवाहन जनतेला केले आहे. उत्तरप्रदेशातून अखिलेश यादव यांनीही ममतांना पाठिंबा जाहीर केला आहे.
ममतांचे समर्थनाचे कारण
ममतांना समर्थन देणाऱया शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षांचा चेहरा करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. राहुल गांधी हे मोदींना पर्याय ठरत नसल्याचे मत आता विरोधी पक्षांदरम्यान निर्माण होत आहे. याचमुळे बिगरकाँग्रेस पक्षांदरम्यान सर्वसमावेशक चेहरा पुढे करण्यासंबंधी विचारविनिमय सुरू आहे.
काँग्रेसला मजबूत होऊ न देणे
अन्य प्रादेशिक पक्ष ममतांसोबत येण्याचे दुसरे एक कारण आहे. राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा उदयच मुळात काँग्रेस कमकुवत ठरल्याने झाला आहे. बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस प्रादेशिक पक्षांचा ज्युनियर पार्टनर ठरला आहे. ही स्थिती काँग्रेस कमकुवत असेपर्यंतच राहणार असल्याचे प्रादेशिक पक्षांना ज्ञात आहे. ते काँग्रेसला मजबूत होण्याची संधी देऊ इच्छित नाहीत.
संबंधांवर किती परिणाम
बंगालमध्ये जे राजकीय पक्ष ममतांच्या समर्थनार्थ काँग्रेस आणि डाव्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, या राजकीय पक्षांच्या राज्यांमधील आघाडीवर फारसा प्रभाव पडणार नसल्याचे मानले जाते. मूळात आघाडी करण्याचा निर्णय राजकीय तडजोडीचा असतो. काँग्रेस आणि डाव्यांच्या विरोधात प्रचार करणरे तेजस्वी यादव बिहारमध्ये त्यांच्यापासून वेगळे होऊ शकत नाहीत. कारण तेथील राजकीय स्थितीत महाआघाडी राहणे आवश्यक आहे. झारखंडमध्ये काँग्रेस हेमंत सोरेन सरकारमधून बाहेर पडणार नाही.