प्रतिनिधी/ सातारा
मराठा समाजात ही आर्थिक, सामाजिक दृष्टय़ा लोक आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे. या आरक्षणासाठी सर्वांनी एक होवून लढले पाहिजे. दुसऱया समाजाचे आरक्षण काढून द्या असे म्हणत नाही. तर आम्हाला आमचेच द्या, अशी आम्हा मराठा समाजाची मागणी आहे. नव्या पिढीवर आरक्षणाचा परिणाम होत आहे. त्यांना न्याय मिळवून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हा लढा सर्वांनी ताकदीने लढूया, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिपादन केले.
कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक यांच्या मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, आमदार म्हणून अथवा राजे म्हणून मी येथे आलो नाही. मी मराठा समाजातील घटक म्हणून आलो आहे. मराठा समाजाच्या लढय़ाला यश येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहे. त्यास पाठींबा आहे. आजच्या परिषदेत आपण ठराव मांडणार आहात. सातारा जिह्यातील सर्व मराठा समाज मराठा आरक्षणाबाबत आपल्या बरोबर होता, आहे आणि राहिल असे ठामपणे शिवेंद्रराजेंनी सांगितले. आरक्षणामुळे आजच्या पिढीवर फार मोठा परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार राज्य सरकार असेल अथवा केंद्र सरकार. खर तर सर्वच पक्षांनी हा विचार केला पाहिजे. युवा वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अन्यथा भविष्यात महाराष्ट्रातील सामाजिक घडी विस्कटलेली असेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.