ऑनलाईन टीम / बीड :
मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून, भाजप नेत्या पंकजा मुंडे या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्तंय गळ्यात हार घालणार नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत मला कोणी फेटा बांधायचा नाही,’ अशी घोषणा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.
बीडमधील भाजप समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
‘बीडमध्ये एक सुंदर उदाहरण घालून देऊ आरक्षण लढा वेगळ्या मार्गाने उभा करूया. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत मला कोणी फेटा बांधायचा नाही,’ असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
‘ज्याला खुर्चीवर बसायचे आहे, त्याला आपण आपआपसात भांडून मरावे असे वाटते पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी असे केले नाही. त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केले. गोपीनाथ मुंडे यांना मी एकदा विचारले होते तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव समोर ठेऊन राजकारण करत असल्याचे सांगितले होते,’ अशी आठवणही पंकजा मुंडे यांनी सांगितली.