ऑनलाईन टीम / नांदेड
मराठा आरक्षण प्रश्नावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात शितयूद्ध सूरु असून अनेक राजकीय नेते आरक्षण दिले कोणी आणि आरक्षण रद्दची वेळ आणली कोणी यावर एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत या प्रश्नावर चर्चा केली होती. याच मुद्यावर अशोक चव्हाण यांनी आज नांदेड येथे मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी मोर्चांचा अवलंब न करता यापेक्षा न्यायालयीन लढाई महत्वाची आहे. मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत त्यांनी संसदेत विषय उचलून धरला तरच फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यातच संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्यभर दौरे करत मराठा आरक्षण प्रश्नी ठोक मोर्चाचे आयोजन करत प्रशासनाला इशारा दिला आहे. यावरुन १६ जूनचा अल्टीमेटम ही दिला आहे. यावर प्रतिक्रीय देत अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.