कोरोनाची साथ आली. पसरत गेली. सगळीकडे लॉकडाऊन झाले. मोठय़ा शहरात झोपडपट्टी किंवा चाळीत दाटीवाटीने राहणाऱया परप्रांतियांचे रोजगार आणि धंदे बुडाले. त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळता येईना. ते आपापल्या प्रांतात परतले. लाखो परप्रांतीय असे परत गेले तेव्हा लोक म्हणू लागले की आता हे गेले. आता आपल्या मराठी तरुणांना ही पोकळी भरून काढता येईल. रोजगार मिळतील, वगैरे.
डोळय़ांसमोर चित्र आले. रस्त्यावर भाजी, किरकोळ वस्तू, मासळी, दूध, भेळ, पाणीपुरी, फास्ट फूड विकणारे, इस्त्री, सुतारकाम, वायरिंग, बांधकाम करणारे सगळे… सगळे शुद्ध मराठीत बोलत आहेत. मराठी गाणी गुणगुणत आहेत. सुट्टीच्या दिवशी मराठी सिनेमा, नाटक बघायला गर्दी करीत आहेत. त्यांच्याशी बोलताना आपण वपु, पुलंच्या पुस्तकातली कोटी केल्यावर त्यांना ती समजते आहे आणि हसू येते आहे.
बघता बघता दिवस जात होते. आषाढी आली. नेत्यांनी चिथावणी दिली. पण वारकरी वर्गाने त्याला बळी न पडता यंदाची वारी रद्द केली. विठोबाला घरातूनच मनोभावे नमस्कार केले.
गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. नेत्यांनी आवाहने केली आहेत आणि त्यानुसार शहरातल्या मंडळांनी उत्सव साध्या पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. यंदा विसर्जनाच्या मिरवणुकादेखील टाळल्या जाणार आहेत.
पण शहरात नोकऱया करणारे अनेक लोक सालाबादप्रमाणे सुट्टय़ा काढून गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी निघाले आहेत. गावातल्या लोकांनी मात्र त्यांना अटी घातल्या आहेत. गावी पोचल्यावर त्यांना दोन आठवडे क्वारंटाइन व्हावे लागेल. मग उत्सव पार पडेल. मग पुन्हा ते शहरात परत येतील. पुन्हा इथे दोन आठवडे क्वारंटाइन व्हावे लागेलच.
दरम्यानच्या काळात घरी परतलेले परप्रांतीय हळूहळू परत येऊ लागले आहेत. काही दिवसांनी सगळे परत येतीलच. क्वारंटाइन होतील आणि नंतर आपापली कामे सुरू करतील. भाजी, किरकोळ वस्तू, मासळी, दूध, भेळ, पाणीपुरी, फास्ट फूड विकणारे, इस्त्री, सुतारकाम, वायरिंग, बांधकाम करणारे सगळे… सगळे शुद्ध मराठीत बोलतील, मराठी गाणी गुणगुणतील, सुट्टीच्या दिवशी मराठी नाटकाला जातील वगैरे स्वप्ने मी विसरून गेलो आहे. या लोकांमुळे आपल्या लोकांचे रोजगार बुडतात वगैरे गोष्टी पुढारी लोक भाषणात सांगतील तेव्हा मी नेहमीप्रमाणे जोरदार टाळय़ा वाजवून प्रतिसाद नक्की देईन.