महामार्ग प्राधिकरणाचे दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष : पाणी साचल्याने पादचारी-वाहनचालकांना धोका
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहराजवळून जाणाऱया महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावर पाणी साचण्याचा प्रकार नेहमी घडत आहे. पण याकडे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. तसेच स्थानिक प्रशासनही याची दखल घ्यायला तयार नाही. नेहमी पुलावर पाणी साचल्याने याचा परिणाम मात्र पुलावरून जाणाऱया पादचारी तसेच वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
या पुलावर रुमेवाडीकडून येणाऱया तसेच खानापूर शहरातून जाणाऱया महामार्गाचे पाणी एकत्रित जमते. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने ते पाणी साठून पुलावरच थांबते. पाण्याचा निचरा होण्यासाठी पुलाला असलेली छिद्रेदेखील नेहमी मुजतच आहेत. त्यातच या पुलावरून वाहतूकदेखील मोठय़ाप्रमाणात असते. तसेच शाळकरी मुले तसेच इतर पादचाऱयांची देखील बरीच वर्दळ असते. पाऊस मोठा आला की, पुलावर पाणी साचते. आणि वाहनांच्या वर्दळीमुळे त्या पाण्याचा शिडकाव पादचाऱयांच्या अंगावर होतो. त्यामुळे पादचारी अडचणीत येतात. तसेच एकदम कडेला गेले तर नदीत पडण्याचाही धोका असतो. एकूणच पावसाळा सुरू झाला की, त्या पुलावर नेहमीच पाणी साचून राहते. यामुळे मोठय़ा पावसात गेली दोन वर्षे पूलच पाण्याखाली गेला होता. यामुळे काहीकांळ त्या पुलावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. पण पूल ओसरल्यानंतर तो पूल मोकळा झाला तरी त्यावर दोन्ही बाजूचे पाणी येऊन साठण्याचा प्रकार मात्र नेहमीच घडतो. यासंदर्भात वृत्तपत्रातून छायाचित्रासह अनेकवेळा बातमी प्रसिद्ध करून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांचे व झोपाळू प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तसेच कुणी लोकप्रतिनिधी देखील याची दखल घ्यायला तयार नाही, अशा परिस्थितीत काही अनर्थ घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संपूर्ण पूलच धोकादायक आहे. त्यातच पावसाळय़ातील पुलावर साचणाऱया पाण्यामुळे तर अधिकच धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी असोत किंवा महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी असोत त्यांनी याची तातडीने दखल घेऊन पुलावर साचणाऱया पाण्याचा निचरा हेण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.