दलदलीमुळे रस्त्यावर साचले पावसाचे पाणी : वाहतुकीस अडथळा : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर / किणये
सोनोली – बिजगर्णी रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. तसेच रस्त्यावर चिखलही झालेला आहे. यामुळे या रस्त्यांवर दलदल निर्माण झाली आहे. खड्डे आणि चिखलामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रशासनाचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुसळधार पाऊस, रस्त्यावरील खड्डे आणि चिखल यामुळे बिजगर्णी – सोनोली परिसरात वाहतूक करणे अवघड झाले आहे. या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मोठी दुर्घटना होण्याआधीच या रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
सोनोली गावच्या मुख्य रस्त्यावर अक्षरशः दलदल झाली आहे. बेळगुंदी ते राकसकोप रस्त्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. यामुळे रस्त्याच्या बाजूने गटारीचे कामकाजही सुरू आहे. गटारीच्या कामकाजाकरिता माती काढण्यात आली होती. यामुळे सध्या रस्त्यावर चिखल झाला असून पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागले आहे. यामुळे सोनोली गावच्या नाल्यापासून ते गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सोनोली गावातील नाल्यापासून ते गावापर्यंतच्या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सोनोली-बिजगर्णी या संपर्क रस्त्यावरही काही ठिकाणी खड्डे पडलेले असून त्या खड्डय़ांमध्ये सध्या पावसाचे पाणी साचले आहे. या संपर्क रस्त्यावरील बिजगर्णी गावानजीक रस्त्यावर अधिक प्रमाणात पाणी साचले असून रस्त्याचा भागच या ठिकाणी दिसून येत नसल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
बिजगर्णी गावच्या मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गावातील पाण्याच्या टाकीपासून ते बिजगर्णी-बेळवट्टी मुख्य रस्त्याच्या सर्कलपर्यंत पाईपलाईन करण्यासाठी खोदाई करण्यात आली
होती.
याची माती रस्त्यावर आली असून पावसामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून सध्या सायकल घेऊन जाणे किंवा चालत जाणेही मुश्कील बनले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. तर काही जणांना या ठिकाणी ये-जा करीत असताना घसरगुंडी करावी लागत आहे.कर्ले ते कावळेवाडी या संपर्क रस्त्यावरील कावळेवाडी गावानजीक रस्त्यावर भलामोठा खड्डा पडलेला आहे. तर याच ठिकाणी रस्त्याचा काही भाग गेल्यावषी अतिवृष्टीमध्ये वाहून गेला होता.
त्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कावळेवाडी नाल्यानजीक हा रस्ता धोकादायक बनला असून गेल्यावषी रस्त्याचा भाग वाहून गेला होता. त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. सध्या याठिकाणी मोठा खड्डा पडला असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. बिजगर्णी, कावळेवडी, सोनोली, बेळवट्टी, बेळगुंदी, जानेवाडी, कर्ले आदी पश्चिम भागातील नागरिकांसाठी हे रस्ते महत्त्वाचे असून या भागातील नागरिकांना या रस्त्यावरून रोज ये-जा करावी लागते.मात्र रस्त्यांवर सध्या असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे व चिखलामुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेले आहेत.