प्रतिनिधी /फोंडा
फोंडा शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात विलंब झाल्याने फोंडय़ातील नागरिकांनी दाग फोंडा येथील मलनिस्सारण कार्यालयावर धडक देत, अधिकाऱयांना जाब विचारला. गेल्या सहा वर्षांपासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम संपता संपत नाही. या कामात कोणतेच नियोजन नसल्याचे नारिकांसाठी हा प्रकल्प म्हणजे मोठी डोखेदुखी बनली आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
फोंडा शहरातील रस्ते मधोमध खोदल्याने वाहतुकीला सोयिस्कर मार्गच उरलेला नाही. कंत्राटदाराच्या बेपरवाईमुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दाग येथे काम सुरु होऊन वर्ष उलटले आहे. त्यातच सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रस्ता खोदून ठेवलेला आहे. पावळय़ात या रस्त्यावर भर चिखलातून वाहने हाकावी लागली. आता मोठय़ा प्रमाणात धूळ प्रदूषण सुरु आहे. कवळे दुर्भाट भागातील लोकांना फोंडय़ात ये जा करताना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खोदमाच्या ठिकाणी काँक्रिट टाकलेल्या रस्त्यावर उंचवटे तयार झाले आहेत. शिवाय बाजूला लावलेल्या पत्र्यांमुळेही वाहनचाकांना कायम धोका आहे. भाजपाचे स्थानिक नेते सुनिल देसाई, उदय डांगी व अन्य नागरिकांचा या मोर्चात सहभाग होता.
अभियंता प्रदीप गावडे यांनी मलनिस्सारण प्रकल्पाचे काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे नागरिकांना सांगितले.