प्रतिनिधी / पणजी :
मळा ते पाटो या दरम्यान रिओ-द-औरेम खाडीवर बांधण्यात येत असलेल्या दुसऱया पुलाचे बाधकाम सध्या प्रलंबित राहिले आहे. जलस्रोत खात्याने पावसाळय़ात खाडीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत हा पूल वाहतुकीस खुला केला जाणार नाही.
पाटो-ते पणजी मळा या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकाच वेळी पुलाची जोडी उभारण्याचा निर्णय घेतला व काम हाती घेतल्यानंतर बांधकाम सुरू करण्यात अनेकांनी विघ्ने आणली. त्यातच अनेक वर्षे बेकायदा बांधकामे करून रहाणाऱयांनी देखील पुलाचे काम अडविले होते. अखेरीस एका बाजूच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. आता द्वितीय पुलाचे बांधकाम दीड वर्षापूर्वी सुरू झाले होते. प्रत्यक्षात ते जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र पूल व रस्ता या दरम्यान जोड रस्त्याचे काम थोडे शिल्लक राहिलेले आहे.
विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांनी जलस्रोत खाते जोपर्यंत मळा भागात पावसाळय़ात खाडीचे पाणी नागरी भूमीत वर सरते ते येऊ नये यासाठी संरक्षक भिंत तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ते काम हाती घेतलेले आहे, ते पूर्ण होईपर्यंत पुलाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करायचे नाही, असे कळविले असल्याने गोवा पायाभूत सुविधा महामंडळाने या नव्या पुलाचे डांबरीकरण हाती घेतलेले नाही.
जलस्रोत खात्याने चर मारून ठेवलेले आहे. परंतु कंत्राटदाराने अद्याप काम सुरू केलेले नाही. त्यामुळे या पुलाचे उर्वरित काम व तो वाहतुकीस खुला करण्यास जो विलंब लागतोय त्याला जलस्रोत खाते जबाबदार ठरणार आहे. कदाचित पावसात पाणी वाढण्याच्या प्रकाराने जलस्रोत खात्याला बांधकाम करण्यात मोठा व्यत्यय येत असावा, असा अंदाज आहे.