वसंतसेना धावत धावत चारुदत्ताला वाचवण्यासाठी गर्दीतून वाट काढत जाते. तेव्हा चांडाळ शेवटचं कोणाला ते आठव म्हणून चारुदत्ताला सांगतो. ‘आता काय बोलण्यासारखं राहिलंय?’ असं निराशेने बोलतो. तेव्हा चांडाळ आपली तलवार उपसून म्हणतो, ‘आर्य चारुदत्त, आता मान वर करून सरळ उभा रहा. एकाच घावात तुला मारून स्वर्गात धाडतो.’
चारुदत्त तसे उभा राहतो. तो घाव घालण्यासाठी तलवार वर उचलतो तेवढय़ात ती त्याच्या हातातून खेचली जाऊन जमिनीवर पडते. त्याला वाटते हे । जे घडत आहे, त्याअर्थी चारुदत्त मरणार नाही. तो भगवती सह्यवासिनीला प्रार्थना करतो की, तिने प्रसन्न होऊन चारुदत्ताला शिक्षेतून मुक्त करावे आणि चांडाळकुळाचाही उद्धार करावा. पण दुसरा म्हणतो आपण राजाचा आदेश पाळला पाहिजे. तेवढय़ात भिक्षु आणि वसंतसेना एकदम ओरडून म्हणतात, ‘अहो असं करू नका. सद्गृहस्थहो, मीच ती दुर्दैवी वसंतसेना आहे. जिला मारण्याच्या आरोपावरून ह्यांना मारलं जातंय.’ चांडाळ त्या ओरडत आणि मारू नका सांगत येणाऱया स्त्रीकडे पहात राहिले. वसंतसेना ‘चारुदत्त, चारुदत्त हे काय चाललंय?’ असे विचारत त्याच्या अंगाला येऊन बिलगते. तर भिक्षुही त्याच्या पायांवर स्वतःला झोकून देतो.
चांडाळाला ती वसंतसेना आहे हे समजल्यावर आपल्या हातून चारुदत्ताला मारण्याचे पातक घडले नाही याचे समाधान वाटते. तर भिक्षुला चारुदत्त जिवंत आहे हे पाहून आनंद होतो. हा वृत्तांत यज्ञशाळेत गेलेल्या राजाला जाऊन सांगायला हवा, असे म्हणत दोन्ही चांडाळ तिथून जातात. शकार तिथे अचानक आलेल्या वसंतसेनेला पाहून ही जिवंत कशी झाली म्हणून चकित होतो. आपले बिंग फुटणार म्हणून तिथून पळू लागतो. तेव्हा चांडाळ राजाकडून येत असतात. त्यांना राजाने आज्ञा दिलेली असते की, ज्याने कुणी वसंतसेनेला मारले असेल, त्याला मारून टाका.’ म्हणून ते शकाराला शोधायला जातात. वसंतसेनेला पाहून चारुदत्ताला विश्वास बसत नाही. आपण अगदी मरणाच्या दारात असतानाही एखाद्या दुष्काळ पडण्याच्या जागेवर ढग येऊन हवीहवीशी वाटणारी वृष्टी करतो, तशी ऐन मृत्यूच्यावेळी इथे पोचून मला जीवदान देणारी ही स्त्री कोण? असे विचार त्याच्या मनात येतात. तो नीट पाहतो. ही नक्की वसंतसेनाच आहे की दुसरी कुणी? म्हणजे वसंतसेना……वसंतसेना मेलेली नाही? ती तीच आहे? ….तो असा विचार करत असतानाच वसंतसेना त्याच्या पायांवर पडते. रडत रडत त्याला म्हणते, ‘आर्य चारुदत्त, मीच ती अभागिनी आहे, जिच्यामुळे तुम्हांला मृत्युदंडाची भयंकर शिक्षा झाली!’