सातारा / प्रतिनिधी :
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यातच शहराबाहेरील असणाऱ्या रेल्वेस्थानकाजवळील महागाव गावच्या पुलाखाली पाणी भरले आहे. दि. 21 ते 23 जुलै या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत या पुलामध्ये पूर्णपणे पाणी भरल्याने गावाचा संपर्क तुटला होता. अद्यापही या पुलाखाली जवळपास 5 फुटापर्यंत पाणी साचले आहे.
यामुळे या गावातील रहिवाशांचे दळण-वळणच ठप्प झाले आहे. यापूर्वी 2005 साली व 2019 सालीच्या अतिवृष्टी दरम्यान ही येथे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांनी अधिकारी वर्गांना व रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करून ही अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. सातारा शहरापासून जवळच असलेल्या रेल्वेस्थानकाची रेल्वेलाईन ही महागाव या गावाच्या मधुनच जाते. त्यामुळे गावातील नगरिकांची घरे रेल्वेलाईनच्या एका बाजुला तर दुसऱ्या बाजुला गावकऱ्यांची शेती, शाळा आहे. त्यामुळे नागरिकांना संचार कण्यासाठी रेल्वेलाईनच्या खालून पूल निर्माण करण्यात आला आहे. पण या पुलाचा मार्ग सखल भागातुन असल्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत या पुलामध्ये ओढय़ाचे पाणी पूर्णपणे भरले आणि या ग्रामस्थांचा संचार करण्याचा मार्गच बंद झाला. तसेच हे पाणी बाहेर पडण्यास इतर कोणताच मार्ग नसल्याने अद्याप हे पाणी तेथेच साचून आहे.
सध्या ग्रामस्थांना संचार करण्यास इतर कोणताच मार्ग नसल्याने नाईलाजास्तव येथुन प्रवास करावा लागत आहे. त्यातच पाणी साठुन राहिल्याने रोगराई देखील पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व रूग्णांना ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. तसेच शेतीची कामे ही ठप्प झाली आहेत. याचबरोबर येथे पथदिवे बसविण्याची, ओढय़ाची स्वच्छता करण्याची व खोली वाढविण्याची ही मागणी करण्यात आली होती, पण आजवर या मागणीकडे कानाडोळाच करण्यात आला आहे.