प्रा. आनंद मेणसे यांनी मांडले विचार, मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे नाथ पै जन्मशताब्दी साजरी
प्रतिनिधी /बेळगाव
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी बाबुराव ठाकुर, बा. रं. सुंठणकर, सेनापती बापट यांच्यासह अनेकांनी आमरण उपोषण केले. सेनापती बापट यांची प्रकृती खालावल्यामुळे बॅ. नाथ पै यांनी मध्यस्थी करत इंदिरा गांधींची भेट घडवून आणली. यावर तोडगा म्हणून महाजन आयोग नेमण्यात आला. परंतु या आयोगाने सीमाभागावर अन्याय केला. आपण मध्यस्थी करूनही आयोगाने चुकीचा अहवाल दिल्यामुळे हा अहवाल बॅ. नाथ पै यांच्या जिव्हारी लागला, असे विचार प्रा. आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने रविवारी बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठा मंदिरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रा. मेणसे बोलत होते. व्यासपिठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, नूतन नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळूंके, वैशाली भातकांडे उपस्थित होते.
1952 ची निवडणूक ठरली लक्षवेधी
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्ये लोकसभा निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये भीमराव पोतदार, न्यायमूर्ती भुजंगराव दळवी व बॅ. नाथ पै यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये न्यायमूर्ती दळवी यांनी बाजी मारली. बॅ. नाथ पै पराभूत झाले, परंतु निकालाच्या दिवशी संध्याकाळी नाथ पै यांनी दळवी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. पुढील काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी राजकारण हे मैत्रीपूर्ण असे होते. परंतु सध्या मात्र राजकारणाची पातळी घसरल्याचे प्रा. मेणसे यांनी सांगून चिंता व्यक्त केली. ऍड. राम आपटे यांनी बॅ. नाथ पै यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वतंत्रते भगवते हे गीत सादर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मनपावर निवडून गेलेले नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंके व वैशाली भातकांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.