मातृत्व आधार फाऊंडेशनकडून सीमा घाडी यांना आर्थिक मदत : शासन, लोकप्रतिनिधीनींही पुढाकार घेणे गरजेचे
वार्ताहर / मालवण:
सात वर्षांपूर्वी पतीचे अपघातात निधन……..स्वत: अर्धांगवायूने त्रस्त…..अशा स्थितीतही ‘ती’ महिला मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. महान येथील सीमा घाडी गेले अनेक वर्षे हलाखीचे जीवन जगत आहेत. घाडी यांची परिस्थिती समजताच मातृत्व आधार फाऊंडेशनतर्फे त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. परंतु, सीमा घाडी यांच्या मदतीसाठी शासन व लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन मातृत्व आधार फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
महान येथील सीमा घाडी यांच्या पतीचे सात वर्षांपूर्वी रिक्षा अपघातात निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सीमा घाडी या अर्धांगवायूने आजारी असल्याने त्या फारसे काम करू शकत नाहीत. वैष्णवी व विराज या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलणेही त्यांना कठीण झाले आहे. सीमा घाडी यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे हे गेली तीन महिने घाडी यांना स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, अध्यक्ष आप्पा चव्हाण, संचालक कृष्णा साळसकर, प्रफुल्ल देसाई, प्रसाद भोजणे यांनी महान येथे जाऊन सीमा घाडी यांच्या परिवाराची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शासन, लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा!
मातृत्व फाऊंडेशनचे आप्पा चव्हाण म्हणाले, सीमा घाडी यांच्या परिस्थितीची माहिती समाजताच फाऊंडेशनच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेतली. शासनाच्या योजनांच्या लाभाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती समजली. सीमा घाडी यांच्या पतीचा मृत्यू दाखला अद्यापही मिळालेला नाही. त्याबाबतची ग्रामपंचायतीमध्ये नोंदही नाही. आधार कार्डही उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे कठीण आहे. मातृत्व आधार फाऊंडेशन हे सीमा घाडी यांना मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. परंतु शासन, लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.