प्रतिनिधी/ चिपळूण
दरवर्षी पावसाळय़ात मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचा प्रश्न बिकट बनतो आणि गणेशोत्सवात या खाचखळग्यांतून आदळत आपटत कोकणवासियांचा प्रवास सुरू राहतो. यादरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्याच्या खड्डय़ाची चर्चा होते. आंदोलने, इशारे दिले जातात. मंत्रीही दौरे काढतात. मात्र यावर्षीही ‘परंपरे’प्रमाणे महामार्गाची चाळण झालेली असतानाही खड्डय़ांबाबत ना कुठले आंदोलन झाले ना कुठली बोंब उठली. राज्यातील सत्तेत प्रमुख राजकीय पक्ष मांडीला मांडी लावून बसल्याने यावर्षी सर्वांच्याच तोंडाला कुलूप असल्याचे चित्र आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग अशा तीन जिल्हय़ातून जात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सिंधुदूर्ग वगळता बहुतांश ठिकाणी रखडले आहे. पुलांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने जीर्ण झालेल्या ब्रिटीशकालीन पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. रायगडमध्ये तर गेली नऊ वर्ष महामार्गाचे काम रखडलेले आहे. भूसंपादनातील दिरंगाई, पर्यावरण विषयक परवानग्या मिळवण्यात झालेला विलंब, ठेकेदाराची अकार्यक्षमता, निधीची कमतरता आणि आता टाळेबंदी यासारख्या कारणांमुळे महामार्गाचे काम लांबले आहे. पळस्पे ते अगदी झाराप या टप्प्यातील कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे. जिल्हय़ात खेड, चिपळूण आणि संगमेश्वर टप्प्यात काही भागात महामार्गाची स्थिती गंभीर आहे. पडलेले खड्डे यावर्षी भरले न गेल्याने गणेशोत्सवात याच खड्डय़ातून आदळत-आपटत चाकरमान्यांचा प्रवास झाला. अनेक ठिकाणी पुलांची कामे अर्धवट अवस्थेत असून पुलाच्या लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत.
यापूर्वीचा इतिहास पाहिला तर दरवर्षी गणेशोत्सव आला की राजकीय नेतेमंडळी, त्यांचे पदाधिकारी आंदोलनासाठी हौसेने पुढे येतात. इशारे, निवेदने देत बसतात. मंत्रीही कोकणातील महामार्गाची पहाणीसाठी दौरे काढतात. गतवर्षीपर्यंत हे सर्व चालत आलेले आहे. मात्र यावर्षी कुणीही दखल घेतली नाही. महामार्गाबाबत साधी अधिकाऱयांची बैठकही झालेली नाही. महामार्ग पाहणी दौराही मंत्र्यांचा झालेला नाही. सद्यस्थितीत महामार्गाची चाळण झालेली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. चिपळूण आणि संगमेश्वरपर्यंत रस्ता खड्डेमय झालेला असतानाही यावर्षी कुठलाही राजकीय पक्ष अथवा त्यांच्या नेत्यांकडून या महामार्गावरील खड्डय़ांबाबत चकार शब्द काढलेला दिसला नाही. शेवटी याच खड्डय़ांतून चाकरमान्यांचा आगमनाचा प्रवास पार पडला. कदाचित राज्यातील महाआघाडीच्या सत्तेत कोकणातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष असल्याने बोंबा मारणार तरी कोण? असा तर्क चाकरमान्यांनी काढला आहे.
गुहागर-चिपळूण महामार्गावरील मिरजोळी येथे पडलेला खड्डा गेल्या वर्षभरापासून आहे. तेथील नागरिकांनी महामार्गाच्या अधिकाऱयांना वारंवार निवेदने दिली. मात्र कुणीही दखल घेतलेली नाही. खड्डा मोठा असल्याने शेवटी तेथील नागरिकांनीच रस्त्याच्या मधोमध फलक लावला. तरीही अधिकाऱयांना जाग आलेली नाही. मध्यंतरी कुणीतरी आंदोलन करीत गणेशोत्सवापूर्वी खड्डा न भरल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा दिला. मात्र इशाऱयाव्यतिरिक्त पुढे काहीच न झाल्याने खड्डा आजही कायम राहिला आहे.
यावर्षी महामार्गावरील खड्डय़ातूनच चाकरमान्यांचे आगमन झालेले असले तरी परतीचा प्रवास तरी चांगला व्हावा यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी महामार्ग विभागाने ठेकेदाराला सूचना करणे आवश्यक आहे आणि शांत बसून राहिलेल्या राजकीय पक्षांनीही चाकरमान्यांच्या सुखकर परतीच्या प्रवासासाठी लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत चाकरमान्यांतून व्यक्त होत आहे.