ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर आला आहे. राज्यात बुधवारी ९९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. काल कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात सध्या ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
१ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून १ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा ४.७४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.
राज्यात बुधवारी १२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबई ४९, उल्हासनगर ३, ठाणे २, नवी मुंबई ३, वसई विरार १, भिवंडी १, मीरा भाईंदर- १, नाशिक- ८, पुणे १९, सोलापूर १०, कोल्हापूर- २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबाद १, अकोला-२ व इतर राज्ये-३ (उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. मृतांमध्ये ७१ पुरुष तर ५१ महिला रुग्ण आहेत.