ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचे स्वागत करावे. समुद्रकिनारे, उद्याने तसेच रस्त्यावर जाऊ नये असे देखील सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे.
सर्कुलरमध्ये विशेषत: दहा वर्षांखालील मुले आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी आणि जुहू इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात.
दरम्यान, 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. 11 वाजल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.