सातारा / प्रतिनिधी :
जल हे जीवन आहे असे आपण म्हणतो. सर्वांनाच विशेष करून ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यापासून पासून वाढत जाते. ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. असेच प्रयत्न योगेश किसन चव्हाण या युवकाने केले. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्याचा ‘द बेटर इंडिया’ या डिजिटल मीडिया द्वारा २०२० मधील हिरोज ऑफ सुचूओशनलिबिटी साठी दहा अतुलनीय भारतीय नायकांच्या यादीत समावेश झाला.
योगेश चव्हाण हा दहिगाव ता. कोरेगाव येथील युवक. त्यामुळे लहानपणापासूनच गावच्या लोकांचे पाण्यासाठीचे हाल पाहिले होते व स्वतः सोसले होते. उच्च शिक्षण घेऊन मानव संसाधन विभागात रूजू झाल्यानंतर तेव्हा विविध कंपन्यांच्या सीएसआर प्रमुखांची बोलून सी.एस.आर फंड गावच्या जल व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून घेतला आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने वसना नदी पुर्णजीवीकरण व शिवारातील ओढ्यांवर लहान-मोठे सर्व बंधारे दुरूस्ती करून जलसंवर्धन केले. त्यामुळे बोअरवेल, हात पंप आणि विहीर यांचा पाणीसाठा ७० ते ८० फुटांवरून २० फुटावर आली आणि बळीराजा सुखावला गेला. अगोदर असणारे दुष्काळग्रस्त असलेले गाव टँकरमुक्त झाले. एवढ्यावरच न थांबता आपल्या पंचक्रोशीतील आसनगाव देखील तेथील ग्रामस्थांना एकत्र करून पाणीदार केले व आता इतर गावासाठी ही त्याचे हे प्रयत्न सध्या चालू आहेत व पुढे चालू राहतील.
योगेश यांनी आपल्या कृतीतून आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या मानसिकतेतून अवघ्या महाराष्ट्राला व देशाला दाखवून दिले आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. गावातील तरुणांना रोजगार आपल्या गावांमध्ये उपलब्ध करून देण्यात जास्त भर दिला जाणार आहे.
या कामासाठी ग्रामगौरव प्रतिष्ठान सासवड यांची मोलाची साथ लाभली. हे केले तर गांधीजींचा खेड्याकडे चला हा संदेश सार्थ ठरेल. योगेश सुचवतात की, कंपन्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून आपला सी एस आर फंड शहरासोबतच ग्रामीण भागाकडे जास्त प्रमाणात वळवून त्यांच्या खेड्यापाड्यातील विकासावरही लक्ष केंद्रित करावे.