अध्यक्षपदी ठाणे जिह्यातील ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण
प्रतिनिधी / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे सुपुत्र, जिल्हय़ातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सिलचे सदस्य ऍड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर, ठाणे जिल्हय़ातील ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोकणच्या सुपुत्रांची झालेली ही निवड म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. या निवडीबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सर्वस्तरातून व कोकणवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यातील दीड लाखांहून अधिक वकिलांचे प्रतिनिधीत्व करणाऱया बार कौन्सिलच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोकणच्या सुपुत्रांची झालेली निवड इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे. मुंबई हायकोर्टातील बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या मुख्य कार्यालयात शनिवारी महाराष्ट्राचे महाधिवक्ता ऍड. आशुतोष कुंभकोणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड त्यांनी जाहीर केली.
बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोव्याच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऍड. देसाई उभे राहिले होते. एकूण 169 उमेदवारांमधून 25 उमेदवारांची निवड करायची होती. यात संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून 2500 हून अधिक मते मिळवत ऍड. देसाई हे नवव्या क्रमांकाने विजयी झाले होते. विशेष म्हणजे 512 वकील संख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातून ऍड. देसाई यांनी ही निवडणूक लढविली आणि पहिल्या पसंतीची मते मिळवत विजय संपादन केला होता. बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे सर्वात तरुण सदस्य म्हणून ते निवडून आले आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी झाल्यानंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवड ही जिल्हय़ासाठी अभिमानास्पद आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जिल्हय़ातील नावाजलेले वकील (कै.) डी. डी. देसाई यांचे संग्राम देसाई हे सुपुत्र. श्री. देसाई यांनी सिंधुदुर्गमध्ये अनेक गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये बाजू मांडली होती. सिंधुदुर्ग जिल्हय़ात एक प्रथितयश वकील अशी त्यांची ओळख आहे. बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या सदस्यपदी निवडून आल्यानंतर अनेक गरजू, संकटग्रस्तांना कौन्सिलच्या माध्यमातून मदत करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला बळ मिळणार आहे.
मुंबई येथे झालेल्या या बैठकीवेळी ऍड. अभय खांडेपारकर त्यांच्यासमवेत सिंधुदुर्गमधून ऍड. उमेश सावंत, ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. अमोल सामंत, ऍड. अनिल निरवडेकर, ऍड. निखिल गावडे, ऍड. स्वरुप पै, ऍड. यतिश खानोलकर, ऍड. ऋषी देसाई, ऍड. महेश शिंपुकडे, ऍड. आनंद गवंडे, ऍड. अमित सावंत, ऍड. विवेक मांडकुलकर, ऍड. संजय खानोलकर, ऍड. शार्दुल पिंगुळकर, ऍड. हितेश कुडाळकर, ऍड. अविनाश परब तसेच ऍड. रवी जानकर कोल्हापूर, ऍड. गोविंद दळवी व ऍड. संदीप पाटील (चंदगड) हे उपस्थित होते.