ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रात देखील चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही महाराष्ट्रातील पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. त्यात काही पोलिस कर्मचारी या कारोनाचे शिकार बनले आहेत.
येत्या 25 मे ला रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) वीस तुकड्यांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्रात राज्य राखीव पोलीस दलाच्या 32 कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे.त्यामुळे लवकरात लवकर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 तुकड्या मिळाव्यात अशी मागणी मी केली आहे, असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आता पर्यंत महाराष्टातील 800 पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून 7 पोलिसांचा कोरोनाने जीव घेतला आहे.