प्रतिनिधी / इस्लामपूर
केंद्र सरकार राज्य सरकारला मदत देत नसेल,तर तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करा. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या आंदोलनात तुमच्या बरोबर असेल. राज्य सरकार काटकसर करतय असे सांगत आहे. पण तसे दिसत नाही. मंत्र्यांची दालने सजत आहेत. गाडया घेत आहात, मग पुरग्रस्तांना पैसे द्यायला का नाहीत ?. त्यांनी विकास कामांचा निधी कोरोनाच्या नावाखाली वळवून प्रचंड भ्रष्टाचार करुन उधळपट्टी केली आहे. जिथे महाविकास आघाडी सरकारचे चुकतंय, तिथे मी त्यांच्या विरोधात ठामपणे बोलणार. मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, अशी घणाघाती टीका माजी खा.राजू शेट्टी यांनी केली.
महाविकास आघाडी सरकार विरोधात पुरग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी सर्व विरोधी पक्षाच्यावतीने प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चाची सुरुवात कचेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, पृथ्वीराज पवार, प्रसाद पाटील, शाकीर तांबोळी, महेश खराडे, संजय बेले, संदीप राजोबा, विजय पवार, ॲड.एस.यु.संदे, सनी खराडे, सतिश पवार, भागवत जाधव, संदीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेट्टी पुढे म्हणाले, कोरोना, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. जयंतर पाटील हे पुरग्रस्तांच्या मागण्या काय आहेत, हे माहित नाहीत, असे म्हणत आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जयंतरावांना तर सगळं माहित असतं, मग हेच कसे माहित नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने महापूराचा कायमस्वरुपीचा तोडगा काढत धोरात्मक निर्णय घ्यावेत.अलमट्टीचा विसर्ग कमी- जास्त करून प्रश्न सुटत नाहीत. हे नदीच्या कडेने भिंत बांधायला निघालेत.या सरकारच्या सर्व घोषणा हस्यास्पद आहेत. त्यांचे धोरण फक्त १०-१२ हजार कोटींची योजना राबवायची आणि ठेकेदार जगवायचे. हेच आहे,असा आरोप त्यांनी केला.