उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मिऱयावासियांना धूपप्रतिबंधक बंधारा मार्गी लावण्याचा शब्द दिला आणि त्याची वचनपूर्ती या सरकारच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त केली आहे. बंधारा व तेथील सुशोभिकरणासाठी सरकारकडून सुमारे सव्वादोनशे कोटींचा निधी दिला जाणार आहे. येत्या 2 वर्षात बंधाऱयाचे काम पूर्ण होईल, त्यासाठी जराही निधी कमी पडू देणार नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने रविवारी रत्नागिरीतील मुरुगवाडा पांढरा समुद्र ते मिऱया या सागरी धूपप्रतिबंधक बंधाऱयाचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पार पडला. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ऍड. अनिल परब, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड तसेच येथील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पदाधिकाऱयांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती.
मिऱया येथील किनारा संरक्षणासाठी बांधल्या जाणाऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयांच्या कामासाठी महाविकास आघाडी सरकारकडून 169 कोटीचा निधी दिला जात आहे. दोन वर्षांपूर्वीच हे सरकार सत्तेत येताच चंग बांधण्यात आला होता. कितीही संकटे आली तरी सर्वांगीण विकासासाठी निधी कमतरता पडू देणार नाही. त्याच माध्यमातून या बंधाऱयाचे काम घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सुशोभिकरणासाठीही सुमारे 30 कोटींचा निधी देणार
साडेतीन कि.मी. लांबीच्या या धूपप्रतिबंधक बंधाऱयामुळे येथील किनाऱयाचे लोकवस्तीचे संरक्षण होणार आहे. पण भविष्यात मुंबईतील नरीमन पाँईट धर्तीवर मिऱया गावात पर्यटन विकासाला हातभार लागून येथे रोजगार निर्मिती होणार आहे. या बंधाऱयाच्या कामासाठी निधीबरोबर या परिसरातील सुशोभिकरणासाठी देखील सुमारे 30 कोटींचा निधीही 100 टक्के देण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.
बंधारा येत्या 2 वर्षात पूर्ण होईल
धूपप्रतिबंधक बंधाऱयाचे काम करताना संबंधित ठेकेदाराने ते दर्जेदारच करावे. त्या कामात कसलीच तडजोड केली जाणार नाही. या कोटय़वधीच्या कामात कोणताही भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी ठणकावले. सुशोभिकरणासाठी जे लागेल त्याचा अंतर्भाव केला जावा, असेही सक्त सुनावले. हा बंधारा येत्या 2 वर्षात पूर्ण होईल, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. गावाचे सरंक्षण करण्याग्नबरोबरच येथील पर्यटन वाढीचीही भूमिका या कामाच्या माध्यमातून होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मिऱया बंधारासाठी 169 कोटींचा निधी प्राप्तः सामंत
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिऱया धूपप्रतिबंधक बंधारासाठी 169 कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे सांगितले. 8 वर्षांपूर्वी येथील बंधारा कामावरून जी कटुता निर्माण झाली होती. ती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मिऱयावासियांना दिलेल्या शब्दाची आज वचनपूर्ती झाली आहे. हा बंधारा नरीमन पाँईटसारखा पर्यटनाच्या विकासासाठी झाला पाहिजे, अशी मागणी होती. ती मागणी आता खऱया अर्थाने पूर्णत्वास जाणार आहे. त्यावेळी सामंत यांनी या परिसरातील सुशोभिकरणासाठी 40 ते 45 कोटींची मागणी केली. तसेच येथील विमानतळ विस्तारीकरणाचे भूसंपादन, रत्नागिरीतील प्रशासकीय इमारत यांच्यासाठीही निधीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
महाविकास आघाडीचे सरकार व कोकण यांचे घट्ट नाते असून या सरकारने भरभरून मदत केल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे धूपप्रतिबंधक बंधाऱयाचा हा कार्यक्रम या सरकारच्या वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे. जगाच्या नकाशावर या बंधाऱयाच्या कामाचे नाव भविष्यात घेतले जाईल, असे परब यांनी सांगितले. यावेळी मिऱया गावाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिनेश सावंत, आप्पा वांदरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांच्याहस्ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या 2 दिवसांत मंत्री सामंत यांचा पवार यांच्याहस्ते 7 व्यांदा सत्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गैरसमज पसरवून काहीही विकास होणार नाहीः पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात विरोधकांना टोला लगावताना काहीजण उगाचच महाविकास आघाडी सरकारविषयी नुसते आरोप करताहेत, पण त्यातून कोकणचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल केला. महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम केले पाहिजे. एकमेकांबद्दल उणीधुणी काढून, गैरसमज पसरवून काहीही विकास होणार नसल्याचे पवार यांनी सूचित केले.
कार्यक्रमातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्देः
@आगामी अर्थसंकल्पात रत्नागिरी जिल्हय़ासाठी प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर होईल.
@येथील विमानतळ भूसंपादनासाठी निधी कमी पडू देणार नाही. जागाधारकांना 4 पट मोबदला देणार.
@जि. प. प्रशासकीय इमारतीसाठी लवकरच भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणार.
@रत्नागिरीतील पोलीस वसाहतीसाठी आराखडा तयार करावा. त्यासाठीही निधी देणार.
@रेवस ते रेड्डी महामार्गासाठी 9,570 कोटींची करण्यात आलीय तरतूद.
@शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठीही सरकारने दिले 50 कोटी निधी.
@कुणबी समाजोन्नती संघाच्या मुलुंड येथील वसतीगृहासाठी केली 5 कोटींची तरतूद.
@कोकणातील फळप्रक्रिया उद्योगांसाठी निधी देणार, सामूहिक पध्दतीने शेतकऱयांनी पुढे यावे.
@कोकणी माणसाचे नुकसान टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार घेणार गांभीर्याने दखल.